दोन्ही देशांमधील संबंध बळकटीचा प्रयत्न
बेळगाव : भारत व श्रीलंका या देशांमध्ये संयुक्त लष्करी सरावाला सोमवारपासून प्रारंभ झाला. 10 ते 23 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या कवायतींना ‘मित्रशक्ती-2025’ असे नाव दिले आहे. भारत व श्रीलंका या देशांच्या लष्करी सरावाची ही अकरावी वेळ आहे. विशेष म्हणजे बेळगावच्या फॉरेन ट्रेनिंग नोड येथे या कवायती सुरू आहेत. 170 भारतीय तर 135 श्रीलंकन जवानांचा यामध्ये समावेश आहे. एखाद्या आक्रमणाला प्रतिकार करण्यासाठी या कवायतींमधून प्रशिक्षण दिले जाते. या कवायतींमधून दोन्ही देशांमधील प्रादेशिक शांतता व सुरक्षिततेबाबत माहितीची देवाणघेवाण होते. या देशांमधील संबंध अधिक बळकट करण्यासाठी मदत होत असल्याचे आर्मीचे अॅडिशनल डायरेक्टर ऑफ जनरल पब्लिक इन्फर्मेशन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले. यापूर्वी या दोन्ही देशांमध्ये श्रीलंकेतील मादुरू येथे संयुक्त कवायती झाल्या होत्या. आता 11 व्या कवायती बेळगावमध्ये होत आहेत. राजपूत रेजिमेंटचे 170 जवान तर श्रीलंकेच्या गजबा रेजिमेंटचे 135 जवान यात सहभागी झाले आहेत. बेळगावमध्ये एमएलआयआरसीचे हेडक्वॉर्टर असल्यामुळे येथे देशातील सर्वोत्तम जवान घडविले जातात. देशावरील संकटकाळात प्रतिकार करणारे ब्लॅक कमांडोही येथेच घडविले होते. त्यामुळे या कवायतींमधून दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास मदत होणार आहे.









