ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत
- तासगाव: शहरासह तालुक्याच्या सर्व भागात दोन ते चार दिवस ढगाळ हवामान व पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे तालुक्यातील द्राक्षबागांवर डाउनी नामक रोगाचा हल्ला होण्याची शक्यता आहे. या हवामानामुळे द्राक्षबागायतदार हवालदिल झाला आहे. हवामान बिघडल्याने व अवकाळी पावसाच्या शक्यतेने द्राक्ष बागायतदार गारठलेत. या स्टेजला पाऊस झाला तर फुलोऱ्यात असणाऱ्या बागांची घडकूज व मणिगळ होणार आहे. तर काढणीच्या खरीपाच्या शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.
द्राक्षपंढरी म्हणून तासगाव तालुक्याची देश विदेशात ओळख आहे. तालुक्यात हजारो एकर क्षेत्रावर तालुक्यात द्राक्ष शेती केली जाते. तासगावची उच्च प्रतीची द्राक्षे व बेदाणा देश विदेशात पाठवला जातो. गेली दोन वर्षांपूर्वी निलोफर चक्री वादळ व अवकाळी पावसाने तालुक्यात थैमान घातले. फुलोऱ्यात पाऊस, धुके व ढगाळ हवामानामुळे डाउनी रोगाचा मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांवर फैलाव झाला होता. घडाचे मणी गळून गेले. तर डाउनी रोगाच्या फैलावाने शेकडो एकर क्षेत्र या रोगास बळी पडले होते. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले.
सध्या आगाप द्राक्षाची पोंगा, विरळणी, फुलोरा व डिपिंगची अवस्था आहे. या दरम्यान डाऊणीचा फैलाव होण्याची दाट शक्यता असते. त्यातच खराब हवामान व पावसाच्या शक्यतेने द्राक्ष बागायतदार चांगलाच गारठला आहे. डाउनी रोगाचा हल्ला रोखण्यासाठी बागायतदार महागडी विविध कंपन्याची औषधे शेतकरी खरेदी करताना दिसत आहे.
या वातावरणाने डाऊनी रोगाची वाढ पानांवर होत आहे. अती पावसामुळे यंदा द्राक्षाचे घड जिरलेत. बागांना माल कमी आहे. त्यातच पाऊस पडला तर उर्वरित द्राक्षाची मोठी हानी होणार आहे. तर गहू, हरभरा, शाळू व अन्य रब्बीच्या पिकांना याचा फायदा होणार आहे. मात्र पावसाच्या शक्यतेने काढणीच्या खरीपाच्या शेतकऱ्यांची धांदल उडली आहे. पाऊस थांबण्याची सर्वजण वाट पाहत आहेत.









