रत्नागिरी :
मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी जशी समिती आहे, तशीच ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठीही एक समिती स्थापन करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्टीकरण पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
मंत्री सामंत यांनी सांगितले, मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलताना माझी जरांगे पाटील यांच्यासोबत मैत्री आहे. त्यांच्या मागण्या मान्य करून मराठा समाजाला न्याय मिळवून दिला आहे, असेही नमूद केले. सामंत यांच्या या स्पष्टीकरणामुळे मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांमधील आरक्षणाबाबतच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आगामी निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या प्रदेशाध्यक्षांकडे आपली भूमिका मांडावी. महायुती एकत्र लढल्यास ‘थम्बिंग मेजॉरिटी‘ने विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोबतच प्रत्येक जागेवर महायुतीकडून तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील एका हॉर्डिंग्जवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना सामंत यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्यातील युती अभेद्य असल्याचे सांगितले. आमच्यात कोणताही श्रेयवाद नाही. ज्यांच्या पोटात पोटशूळ उठलाय, तेच असे गैरसमज पसरवत आहेत, असे ते म्हणाले. हे सांघिक काम आहे आणि त्यात देवेंद्र फडणवीस पाया पडत असतील तर त्यात गैर काही नाही, असे सांगून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
- रोहित पवार यांच्यावर मी का बोलू?
संजय राऊत यांच्यावर टीका करताना सामंत म्हणाले की, त्यांच्या बोलण्याने निवडणुका होत नाहीत आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापासून थांबले नाहीत. महाराष्ट्रातील जनता त्यांना फारशी किंमत देत नाही. रोहित पवार यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. हा प्रश्न जर शरद पवार यांनी उपस्थित केला असता तर मी उत्तर दिलं असतं. रोहित पवार यांच्यावर मी का बोलू? असे सामंत यांनी सांगितल़े








