वृत्तसंस्था/ पुणे
कॅनडा येथे सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या गाथा खडके, शर्वरी शेंडेने जियाना कुमारच्या साथीने ऐतिहासिक कांस्यपदकाचा कामगिरी केली आहे. अमेरिकेच्या संघाचा 6-0 ने असा पराभव करत 18 वर्षांखालील रिकर्व्ह प्रकारात भारतीय मुलींनी कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
पात्रता फेरीत भारत चौथ्या स्थानावर होता. यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाने मेक्सिकोवर 6-0 ने असा विजय मिळवत स्पर्धेत विजयी सलामी दिली. उपांत्यपूर्व लढतीत बलाढ्या जपानचा 5-3 सेटने पराभव भारताने उपांत्य फेरीत मुसंडी मारली होती. उपांत्य फेरीत कोरिया संघाने भारताला कडवी झुंज दिली. 6-2 सेटपर्यंत लढत रंगली. अखेर 1 गुण फरकाने कोरियाने निसटता विजय संपादन केला.
कांस्यपदकाच्या लढतीत मात्र अमेरिकेला भारताने एकाही विजयाची संधी दिली नाही. 55-53, 59-56, 55-52 गुणांसह 6-0 सेटने भारताने ऐतिहासिक कांस्यपदकावर मोहर उमटवली. भारतीय संघांचे प्रशिक्षक रणजित चामले हे या संघांचे प्रशिक्षक होते. रणजीत सरांच्या प्रोत्साहनामुळे हे यश हाती आले असे सोलापूरच्या गाथा खडके हीने सांगितले. कांस्य पदक विजेता संघात सोलापूरच्या गाथा खडके, पुण्याच्या शर्वरी शेंडेसह चंदिगडच्या जियाना कुमार हीचा समावेश होता. खेळाडूंसाठी धावले महाराष्ट्राचे मंत्री
कॅनडाला रवाना होण्यासाठी भारतीय संघांचे विमान 15 ऑगस्ट रोजी होते. परंतु एअर कॅनडाचा संप झाल्यामुळे भारताच्या संघ 4 दिवस विमानतळावरच अडकून पडला होता. भारतीय तिरंदाजी संघटना आणि साईने यांनी विशेष प्रयत्न केले. अखेर महाराष्ट्राचे केंद्रिय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि मुरलीधर मोहोळ खेळाडूंच्या मदतीला धावले. या मराठमोळ्या मंत्र्यांच्या प्रयासाने प्रयत्न खेळाडूंना वेळेवर कॅनडाला रवाना झाले.









