बेळगाव : रक्षाबंधनासाठी भावाला राखी पाठवणाऱ्या बहिणींना पोस्टाच्या सर्व्हरडाऊनचा फटका बसला. दोन दिवसांपासून पोस्ट कार्यालयाचे सर्व्हरडाऊन असल्यामुळे सर्वच कार्यालयांमध्ये गर्दी दिसून आली. त्यामुळे नागरिकांना तासन्तास थांबून राखी पाठविण्याची वेळ आली. शनिवार दि. 9 रोजी सर्वत्र रक्षाबंधन करण्यात येणार आहे. त्यापूर्वी आपल्या भावाला राखी पोहोचावी, यासाठी महिलांची धडपड सुरू होती. दूर राहणाऱ्या भावाला पोस्टाद्वारे राखी पाठवली जाते. परंतु, मागील दोन दिवसापासून सर्व्हरडाऊन आहे. संपूर्ण देशभर ही समस्या येत असल्याचे पोस्ट विभागाने स्पष्ट केले. बेळगावच्या कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात दररोज पार्सलसह रजिस्टर पोस्ट व स्पीड पोस्ट करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, सर्व्हरडाऊनमुळे ही कामे करण्यास विलंब होत होता. राखी वेळेत भावापर्यंत पोहोचावी यासाठी स्पीड पोस्ट केले जात होते. परंतु, स्पीड पोस्ट करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे थांबावे लागत होते. सध्याची पोस्टाची यंत्रणा सर्व्हरवर अवलंबलेली असल्याने सर्व कामे ठप्प झाली होती. त्यामुळे दिवसभर नागरिकांच्या रांगा पहायला मिळाल्या.
Next Article आशा कार्यकर्त्यांचे 12 पासून अहोरात्र आंदोलन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









