मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
► पुणे / प्रतिनिधी
प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदीमध्ये साडेचारशे एकर जागेत श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.
श्री क्षेत्र आळंदी येथे श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला ह. भ. प. शांतीब्रम्ह माऊती महाराज कुरेकर, आमदार उमा खापरे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्मयाचा साक्षेपी चिंतनात्मक आढावा घेणाऱ्या ‘नमो ज्ञानेश्वरा’ या ग्रंथाचे प्रकाशनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या पुस्तकाच्या ऑडिओ बुकचे अनावरणही करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले, ज्ञानपीठ आपल्या हातून व्हावे, ही ईश्वराची योजना असावा.ज्ञानपीठ तयार करण्यासाठी 701 कोटी ऊपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून माध्यमातून भारतीय अध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात जाईल. त्याचबरोबर इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल. याद्वारे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेसह 39 गावातील पाणी शुद्ध करून इंद्रायणीत नेले जाईल. इंद्रायणी नदीचे जल स्वच्छ, निर्मळ होईल असा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले. त्यामुळे आपला विचार, संस्कृती आणि धर्म कोणीही नष्ट करू शकणार नाही. संत परंपरेमुळे आणि त्यांनी दिलेल्या अध्यात्मिक विचारामुळे समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले आहे. प्रत्येक गावातील भागवत सप्ताहामुळे हा विचार सर्वदूर पोहोचविण्यास मदत होत आहे. अध्यात्मिक बैठकीशिवाय मन:शांती मिळत नाही. या अर्थाने जगातील सर्वांत श्रीमंत देश भारत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, योगी निरंजननाथ यांनी प्रास्ताविकात सोहळ्याची माहिती सांगितली.








