भाजप स्थापनादिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही : पक्षांच्या वाटचालीचा आढावा घेताना नव्या धोरणांचाही आढावा
मुंबई :
सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवून आणून परिवर्तनाचा पाया रचणारे एक गतिशील, पारदर्शी, प्रामाणिक सरकार देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून आगामी काळात महाराष्ट्र राज्याला आमचे सरकार सर्वोच्च स्थानी नेल्याखेरीज थांबणार नसल्याचे सांगत जनतेला विकासाबाबत आम्ही बांधील राहणार असल्याची सकारात्मक ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शंभर दिवसांच्या कारभारातून आपण हा संदेश देऊ शकलो आहोत. असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या स्थापनादिनी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या संमेलनामध्ये बोलताना व्यक्त केला आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार, राज्य मंत्रिमंडळातील भाजपाचे सर्व मंत्री, पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सामान्यांच्या विचारांचा संकल्प करा
भारतीय जनता पार्टी ही सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याकरिता महाराष्ट्रात सातत्याने निवडून येत राहील, याकरिता आपला पाया मजबूत करून सामान्य माणसाचा विचारच मनात राहील असा संकल्प करू, आणि या महान पक्षाला अधिक महानता प्राप्त करून देण्यासाठी अधिकाधिक योगदान देण्याचा संकल्प स्थापना दिनानिमित्त सर्वांनी करू या, असा महत्वपूर्ण संदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला.
हा एक विलक्षण योगायोग
अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर राम नवमीच्या दिवशी पक्षाचा स्थापना दिवस साजरा व्हावा हा एक विलक्षण योगायोग नव्हे, तर एक प्रकारचा ईश्वरी संकेत असून ज्या रामराज्याच्या स्थापनेकरिता आपण सगळे प्रयत्नरत आहोत, त्या रामराज्याची आपली वाटचाल सुरू झाली असल्यानेच आज राम नवमीच्या निमित्ताने आपला स्थापना दिवस साजरा करत आहोत, असा उल्लेख करून फडणवीस यांनी सुरुवातीसच पक्षाच्या सुशासन संकल्पाचे स्मरण केले.
उद्धव ठाकरेंच्यामुळे सत्ता मगावली
उद्धव ठाकरे यांनी बेईमानी केल्यामुळे एकदा सत्ता गमावली, पण हिंदुत्वाच्या मुद्यावर उद्धव सेनेचा त्याग करून सोबत आलेल्या एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करून आता तर आपण अभूतपूर्व यश संपादन केले. भक्कम विजयानिशी कार्यकर्त्यांचे आशीर्वाद, मेहनतीमुळे आज राज्यातील सर्वात मोठ्या, शक्तिशाली सरकारचे नेत्त्वृ करण्याची संधी मिळाल्याबद्दल फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाबरोबरच पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचेही आभार व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासाची वाटचाल आज सारे जग अचंबित होऊन पाहात आहे, असे सांगून फडणवीस यांनी या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेतला. 1952 मध्ये जनसंघाच्या स्थापनेपासून ‘राष्ट्र प्रथम’ हा संस्कार मिळाल्याने संघ विचाराने प्रेरित असलेल्या आपल्या असंख्य कार्यकर्त्यांनी लोकशाही व संविधानाच्या संरक्षणाकरिता कित्येक महिने तुरुंगवास भोगला. पुढे लोकशाहीच्या रक्षणाकरिता आपले अस्तित्व जनता पक्षात विलीन केले, दुर्दैवाने कम्युनिस्ट व अन्य पक्षांच्या विचारसरणीमुळे जनता पक्ष फुटला व 1980 मध्ये आजच्या दिवशी जनसंघाचाच विचार घेऊन भारतीय जनता पार्टीच्या रूपाने आपण पुन्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली संकल्पित होऊन राष्ट्रकार्यासाठी सिद्ध झालो. या वाटचालीत, श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत 45 वर्षांच्या कार्यकाळातील ही वाटचाल विलक्षण आहे.
भाजपाची रामाचे नाव घेण्याची पात्रता नाही : उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला
भाजपा निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजनेत वाढीव रक्कमेबाबत बोलले, शेतकऱ्यांना कर्जमाफ करणार असे बोलले होते. त्यांनी लोकांना फसवून मते घेतली असून त्यांना आता ‘प्राण जाये पर वचन न जाये’ याची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. म्हणून राम नवमी हा त्यांच्या पक्षाचा जन्म दिवस असेल तर प्रभू रामचंद्र वागले तसे वागा. रामाचे नाव घेण्याची त्यांची पात्रता नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लागवला. रविवारी ठाकरे शिवसेनेच्या शिव संचार सेना या संघटनेचे बोधचिन्हचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ठाकरे मुंबईत बोलत होते.








