इस्लामपूर :
आष्टा व विटा शहरातील यशवंतनगर येथील वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे तात्काळ पाठविणेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आष्टा व विटा शहरातील प्रश्नाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीला आ. सुहास बाबर, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष निशिकांत मोसते-पाटील, प्रविण माने यांची प्रमुख उपस्थित होती. आष्टा येथील जमिनी १९३१ मध्ये सरकारी जमिनी लिलावात खरेदी करण्यात आल्या होत्या. या ठिकाणी दीड हजाराहून अधिक मिळकतधारक असून गुंठेवारी विकास अधिनियम २००१ प्रमाणे प्लॉट नियमित केले आहेत. गेल्या ४० वर्षांपासून हे मिळकत धारक या ठिकाणी राहत असल्यामुळे त्यावेळच्या धोरणानुसार म्हणजेच ५ टक्के दस्त नोंदणी (रेडी रेकनर) दर आकारण्यात येऊन संबधित प्लॉटधारकांना कायम हक्क देण्यात यावा, अशी मागणी बावनकुळे यांच्याकडे निशिकांत भोसले पाटील यांनी केली होती.
विटा शहरातील यशवंतनगर येथील सुमारे १२५ प्लॉट गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना सुमारे ६५ वर्षांपूर्वी वाटप करण्यात आले होते. या प्लॉटधारकांनी नियमाप्रमाणे सरकारी रक्कम भरलेली होती. सर्वांनी या ठिकाणी घरे बांधून वास्तव्य केलेले आहे. मात्र,अनावधानाने शर्तभंग झालेला आहे. या प्लॉटधारकांना शासनाकडून मोठ्या रकमा भरण्याच्या तसेच वसूलीच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. यामुळे प्लॉटधारक भयभीत झाले होते. त्यांना वर्ग दोन मधून भोगवटादार एक मध्ये परावर्तीत करण्याची विनंती आ. सुहास बाबर यांनी केली होती. पावेळी बावनकुळे यांनी दोन्ही शहरातील प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याच्या दृष्टीने सरकार सकारात्मक असून याबाबत बैठकीतच जिल्हाधिकाऱ्यांना या विषयाचे दोन्ही शहराचे प्रस्ताव शासनाकडे तात्काळ पाठविण्याचे आदेश दिले. यामुळे दोन्ही शहरातील हे प्रश्न कायमस्वरुपी सुटण्याचा मार्ग सुकर झाला आहे.








