कोल्हापूर :
महिला व बालविकास विभागाकडील सर्व बालगृहे, निरीक्षणगृहे, महिला आधारगृहे यातून आवश्यक सेवा व सुविधा देऊन तेथील मुलामुलींना स्वयंपूर्ण होण्यासाठी चांगले शिक्षण मिळेल यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. शहरातील दोन बालगृहांना शेंडा पार्क येथे दहा गुंठे शासकीय जागा मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा पुनर्वसन समिती, जिल्हा बाल कल्याण व जिल्हा बाल संरक्षण समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झाली. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, विविध पुनर्वसन केंद्रात दाखल प्रत्येक गरजूंना पुनर्वसन केंद्राच्या उद्देशाप्रमाणे आवश्यक सेवा देऊन त्यांना त्या त्या वयोगटात शिक्षण द्या. तरूण मुला मुलींना जिल्हा कौशल्य विकास विभागामार्फत सुरू असलेल्या प्रशिक्षणांचा लाभ देऊन स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत करा. पोस्को अंतर्गत आलेल्या केसेसमधील मुलींच्या आरोग्य तपासणीसाठी रूग्णालयात एक नोडल अधिकारी नेमून ती प्रक्रिया सोप्या पद्धतीने पार पडेल यासाठी प्रक्रिया निश्चित करा. तसेच पोस्कोबाबतची केस 24 तासात समितीसमोर आणण्याबाबत नियमावलीचा अभ्यास करून सर्व विभागांना सूचना करा. बालगृहातील मुलांसाठी रेशन उपलब्ध होण्याबाबत नियमातील मुद्दे लक्षात घेऊन मागणीनुसार सर्व ठिकाणी ते पोहचेल यासाठी प्रयत्न करा. विविध प्रकरणांमधील गृह चौकशीसाठी सदस्यांनी तालुके वाटप करून विहित मुदतीत चौकशी पूर्ण करावी अशा सूचना दिल्या.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे, समिती सदस्य अॅड.शिल्पा सुतार, पद्मजा गारे, अश्विनी खाडे, संबंधित विभागाचे प्रतिनिधी व सर्व निरीक्षणगृहे, महिला आधारगृहे, बालगृहांचे अधिक्षक उपस्थित होते.
- जिल्हा वार्षिक योजनेतील 3 टक्के निधीतून प्रस्ताव मागणी
कसबा बावड्यातील शासकीय पुरूष राज्यगृह तसेच शासकीय तेजस्विनी महिला वसतिगृह यांचा शासकीय जागेसाठी प्रस्ताव दिला आहे. याबाबत संबंधितांनी चर्चा केली असता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दोन्ही संस्थांना पाच–पाच गुंठे जागा संस्थेच्या इमारत बांधकामासाठी देऊ असे सांगितले. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 3 टक्के निधीतून प्रस्ताव मागणी करण्याबाबतच्या सूचनाही जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी यांना दिल्या. संस्थेच्या इमारत बांधकामासाठी आवश्यक 10 गुंठे जागा शेंडापार्क येथील जागेतून देण्यात येणार आहे.
- बालविवाह रोखण्यासाठी पोलीस पाटील, ग्रामसेवक महत्वाचे घटक
बालविवाह होऊ नये म्हणून सुरू असलेल्या मोहिमेला अधिक गती देऊन ज्या भागात वारंवार गुन्हे घडत आहेत, अशा ठिकाणांची माहिती तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. अशा भागात जनजागृती, समुपदेशन आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बालविवाह होऊच नयेत म्हणून काम करा. बालविवाह होत असल्याचे कळल्यानंतर पथकात प्राधान्याने पोलिसांचा समावेश करा. बालविवाह रोखण्यासाठी ग्रामस्तरावरील पोलीस पाटील व ग्रामसेवक यांची जबाबदारी महत्त्वाची असून त्यांना याबाबत लेखी कळवा. लग्नसराईच्या काळात विशेष करून या मोहिमेला अधिक गती देत गावातील आशा, अंगणवाडी सेविका यांच्यासह पोलीस पाटील व ग्रामसेवक यांनी गोपनीय माहिती प्रशासनाला द्यावी असे ते यावेळी म्हणाले.
- दत्तक पद्धतीमध्ये चुका
दत्तक पद्धती चुकीची वापरून काही केसेस झाल्याचे समोर आले आहे. यासाठी वारंवार लोकांना दत्तक प्रक्रिया समजावून सांगा. यासाठी जनजागृतीद्वारे माहिती द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या.








