बेळगाव : जुने बेळगाव गावापासून एक नाला बळ्ळारी नाल्यापर्यंत जोडण्यात आला आहे. परंतु, या नाल्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याने पावसाळ्याच्या दिवसात प्लास्टीक व कचरा अडकून सर्व सांडपाणी शेतीमध्ये शिरत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून विहिरीचे पाणीदेखील खराब होत आहे. त्यामुळे एकतर या नाल्याची स्वच्छता करा अन्यथा काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून होत आहे. जुने बेळगाव परिसरात पावसाळी सोबतच उन्हाळी शेती केली जाते. सध्या शेतांमध्ये भाजीपाला तसेच इतर पिके घेण्यात आली आहेत. परंतु, महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. नाल्याचे काम मागील तीन वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. केवळ लोखंडी सळ्या काढून ठेवण्यात आल्या असून त्यावर काँक्रिट नसल्याने या ठिकाणी केव्हा अपघात होईल, याची शाश्वती नाही. काँक्रिटीकरण न झाल्याने पाण्यासोबत आलेला कचरा शेतांमध्ये शिरत आहे. अनेकवेळा तक्रार करून देखील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याची दखल घेतलेली नाही. यामुळे आजूबाजूच्या विहिरींचे पाणी देखील अस्वच्छ होत आहे. नाल्याची वेळच्या वेळी स्वच्छता केली जात नसल्याने सांडपाणी शेतीमध्ये शिरत आहे. या पावसाळ्यापूर्वी नाल्याची स्वच्छता अथवा काँक्रिटीकरण न झाल्यास जुने बेळगाव गावानजीक नालाच बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
Previous Articleयंदा तरी काजूला अपेक्षित दर मिळणार का?
Next Article सोलार रुफटॉप बसवा अन् मोफत वीज मिळवा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









