रत्नागिरी :
येथील कांदळवन विभागाने कासवमित्रांच्या मदतीने सागरी जैवविविधतेचा महत्वाचा घटक असलेल्या आणि सागरी पर्यावरण स्वच्छ करण्याचे महत्वाचे काम करणाऱ्या कासवांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कासवांची अंडी संरक्षित करण्याचे महत्वाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळेच वनपरिक्षेत्र अधिकारी कांदळवन विभाग, दक्षिण कोकणच्यावतीने जिल्ह्याच्या किनारपट्टीवर रत्नागिरी ते मंडणगड वेळासदरम्यान उभारलेल्या ४४८ घरट्यांमध्ये आतापर्यंत तब्बल ४८ हजार ७०१ इतकी अंडी संरक्षित करण्यात कांदळवन विभागाला यश आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या निसर्गरम्य आणि शांत संमुद्रकिनाऱ्यावर थंडीच्या शेवटी अन उन्हाळ्यात अजस्त्र ऑलिव्ह रिडले टर्टल या महाकाय समुद्री कासवाची वीण होते. दुर्दैवाने या कासवांची आणि त्यांच्या अंड्यांची हत्या
जिभेचे चोचले पुरवण्यासाठी काही वर्षांपूर्वी होत असे. कांदळवन विभागाने कासवमित्रांच्या मदतीने सागरी जैवविविधतेचा महत्वाचा घटक असलेल्या आणि सागरी पर्यावरण स्वच्छ करण्याचे महत्वाचे काम करणाऱ्या कासवांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कासवांची अंडी संरक्षित करण्याचे काम सध्या उत्तमरितीने व गतीने सुरू आहे. ऑलिव्ह रिडले सागरी कासव हे निसर्ग संतुलनात महत्वाची कामगिरी पार पाडत असतात. अशा या निसर्ग संतुलनाचीमहत्वाची कामगिरी पार पाडणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीवरील दापोली तालुक्यात आडेतील समुद्र किनारपट्टीवर उभारलेल्या २ घरट्यांमध्ये २०७ अंडी, मुरुड १ घरटे-१३५ अंडी, लाडघर ३ घरटी-२९६ अंडी, दाभोळ ६५ घरटी-६ हजार २८१ अंडी, आंजर्ले ११ घरटी-१ हजार ३११ अंडी, कर्दे ७ घरटी -७७२ अंडी, कोळथरे ३० घरटी-२ हजार ९६४ अंडी आणि केळशी येथे १७ घरटी असून १ हजार ७३६ अंडी संरक्षित केली आहेत. अशाप्रकारे वनपरिक्षेत्र अधिकारी कांदळवन विभाग, दक्षिण कोकणच्या माध्यमातून, दापोली तालुक्यातील समुद्र किनारपट्टीवर १३६ घरटी उभारुन १३ हजार ७०१ एवढी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी संरक्षित करण्याचे महत्वाचे काम केले आहे.

गुहागर तालुक्यात गुहागर येथे १३८ ‘घरटे-१४ हजार ११५ अंडी, गुहागर बाग़ येथे. ६२ घरटी-६ हजार ०९०अंडी, रोहीले येथे १३ घरटी-१ हजार २१२ अंडी, आणि तवसाळमध्ये १४ घरटी-१ हजार ५०५ अंडी तसेच राजापूर तालुक्यात अनुसरे (पानगरे) ११ घरटी-१ हजार १३३ अंडी, माडबन येथे १८ घरटी-१ हजार ८९५ अंडी संरक्षित केली आहेत. त्याचप्रमाणे रत्नागिरीतील गावखडी येथे ३७ घरटी-४ हजार १२० अंडी, मालगुंड येथे १८ घरटी-१ हजार ५६३ अंडी आणि मंडणगड वेळास येथील समुद्र किनारपट्टीवर ३० घरट्यांमध्ये-३ हजार २३२ कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. अशाप्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी ते मंडणगड वेळासपर्यंतच्या समुद्र किनारपट्टीवर ४४८ घरट्यांमध्ये एकूण ४८ हजार ७०१ ऑलिव्ह रिडले टर्टल महाकाय कासवांची अंडी संरक्षित करण्यास वनपरिक्षेत्र अधिकारी कांदळवन विभाग, दक्षिण कोकणच्या या महत्वपूर्ण कामगिरीचे प्राणीमित्रांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. हे वनपरिक्षेत्र अधिकारी कांदळवन विभाग दक्षिण कोकणचे खरोखरच मोठे यश म्हणावे लागेल.








