कोल्हापूर :
गैरप्रकारास उद्युक्तकरणारे, मदत करणारे आणि गैरप्रकारात सामील अशांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करणार. संवेदनशील केंद्रांचे ड्रोनमार्फत चित्रीकरण. दहावी–बारावी परीक्षा संचलनात राज्य मंडळांने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी या परीक्षेत जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना स्वत: लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व अधीक्षक, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय मंडळाचे अध्यक्ष, सचिव ऑनलाईन उपस्थित होते.
राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरात जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी केली जाणार आहे. परीक्षा सुरू होण्याअगोदर परीक्षा केंद्रांवरील भौतिक सुविधांची खात्री जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येईल. परिक्षा चालू असताना जिल्हा प्रशासनामार्फत परीक्षा केंद्रांच्या बाहेर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. भरारी पथके व बैठी पथके नेमण्यात येणार आहेत.
परीक्षा केंद्रावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची एफआरएसद्वारे तपासणी करण्यात येईल. परीक्षेतील गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी 1982 च्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
यावर्षीही परीक्षा केंद्रातील 500 मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात येणार आहे. कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी जिह्यातील पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, पालक सचिव, नामांकित व्यक्ती हे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी आवाहन करणार आहेत.
परीक्षार्थीसाठी राज्य मंडळाकडून ऑनलाइन समुपदेशन करण्यासाठी दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आले आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाने सहा समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. विभागाबाबतचे आदेश विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी जारी केले आहेत.
कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील दहावीच्या 34 तर बारावीच्या 23 परीक्षा केंद्र, सांगली जिल्ह्यातील दहावीच्या 2 व बारावीच्या 4 , सातारा जिल्ह्यातील दहावीच्या 17 व बारावीच्या 12 परीक्षा केंद्रावरील सर्व कर्मचारी बदलले आहेत. कोल्हापूर विभागात दहावीची 357 व बारावीची 176 अशी एकूण 533 केंद्रे आहेत. कोल्हापूर विभागीय मंडळ अंतर्गत सातारा जिह्यातील 73 हजार, सांगली जिह्यातील 72 हजार तर कोल्हापूर जिह्यातील 1 लाख 5 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.








