रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-राजवाडा अॅप्रोच रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे या रस्त्याची पार दुर्दशा झाली असून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी राजवाडा ग्रामस्थांमधून होत आहे. जांबोटी-खानापूर या मुख्य रस्त्यापासून जांबोटी-राजवाडा रस्त्याचे अंतर सुमारे अर्धा किलोमीटर आहे. दहा वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण केले होते. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे या रस्त्याची पूर्णपणे वाताहात झाली असून, हा रस्ता वाहतुकी अयोग्य बनल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. चार-पाच वर्षांपूर्वी माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई यांनी स्थानिक विकास निधीतून या रस्त्याची दुरुस्ती केली होती. मात्र सद्यस्थितीमध्ये या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. स्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी या रस्त्यावर नावालाच डांबर शिल्लक आहे.
सातेरी मंदिरानजीकच्या रस्त्याची तर अक्षरश: चाळणच झाली आहे. मुख्य रस्त्यापासून ते जांबोटी,राजवाडा गावापर्यंतचा हा संपूर्ण रस्ता चढतीचा असल्यामुळे खराब रस्त्यावरून वाहने चालविताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जांबोटी-राजवाडा तसेच रामापूर पेठ या दोन्ही गावांना जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. तसेच प्राथमिक शाळा व हायस्कूलला जाणारे विद्यार्थी तसेच जांबोटी येथे बाजाररहाट तसेच विविध शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या या भागातील नागरिकांना देखील हा रस्ता उपयुक्त आहे. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे गेल्या काही वर्षापासून दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तरी आमदार विठ्ठल हलगेकर व उपविभागाच्या जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी व जांबोटी ग्राम पंचायतीने लक्ष घालून जांबोटी-राजवाडा रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी दोन्ही गावच्या नागरिकांमधून होत आहे.









