वार्ताहर/ जांबोटी
जांबोटी-कुसमळी-बेळगाव अशी शटल बससेवा सुरू करावी तसेच बेळगाव-चोर्ला-पणजी जादा जलद बस सुरू करावी, अशी मागणी जांबोटी, कुसमळी, उचवडे परिसरातील नागरिक व विद्यार्थी वर्गातून होत आहे.
जांबोटी, कुसमळी, उचवडे, सोनारवाडी तसेच किणये आधी गावातून शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थ्यांसह नागरिक नोकरी व्यवसाय, बाजारहाट तसेच इतर कामासाठी पिरनवाडी, उद्यमबाग, बेळगावला नियमितपणे ये-जा करतात. मात्र या मार्गावर अपुरी बससेवा असल्यामुळे सर्वांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी या मार्गाने बस नियमित ये-जा करत होत्या. मात्र सध्या या मार्गावरील कर्नाटक तसेच कदंब परिवहन महामंडळाच्या अनेक जलद व लांब पल्ल्याच्या बसेस खराब रस्त्याची सबब पुढे करून बंद केल्या आहेत. शिवाय अनेक बसेसचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशी व विद्यार्थी वर्गांचे बरेच हाल होत आहेत. दुपारी 12.30 ते 4 वाजेपर्यंत जांबोटीहून, बेळगावकडे जाणारी एकही बस नसल्याने तासंनतास बसच्या प्रतीक्षेत थांबावे लागते. त्यामुळे बस कुचकामी ठरल्या आहेत. गोव्याला जाणाऱ्या सर्व जलद बसगाड्या केवळ बेळगाव, पिरनवाडी, जांबोटी याच ठिकाणी थांबून प्रवासी घेत असल्यामुळे, कुसमळी, उचवडे, किणये, येथून बेळगाव अथवा पिरनवाडी या ठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
सध्या बेळगाव-जांबोटी या मार्गावर सकाळी व संध्याकाळी केवळ चिगुळा आणि चिखले या दोन स्थानिक बसगाड्या धावतात. कुसमळी, उचवडे, सोनारवाडी आदी गावातून माध्यमिक शिक्षणासाठी किणये, पिरनवाडी येथे अनेक विद्यार्थी जातात, मात्र जलद गाड्यांना कुसमळी आणि उचवडे, किणये येथे थांबा नसल्यामुळे तसेच विद्यार्थ्यांच्या वेळेत बस नसल्यामुळे, त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच बेळगाव येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय काही जलद बसमध्ये पासधारक विद्यार्थ्यांना प्रवेश देत नसल्यामुळे स्थानिक बसेसची वाट पाहात थांबावे लागते.
जलद बसेसचा परवाना द्या
सकाळी महाविद्यालयासाठी गेलेले विद्यार्थी रात्री उशिरा घराकडे परतत असल्यामुळे विशेषता विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे. यासाठी बेळगाव व्हाया किणये, कुसमळी-जांबोटी अशी दिवसातून किमान चारवेळा स्थानिक बससेवा सुरू करावी, तसेच बेळगावहून चोर्लामार्गे गोव्याला जाणाऱ्या सर्व जलद बसेसचा विद्यार्थ्यांना बस परवाना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
गोव्यापर्यंत उभे राहून प्रवास करावा लागत असल्याने महिला व लहान मुलांची प्रचंड गैरसोय होत आहे.
जलद बसगाड्याना कुसमळी व किणये येथे बसथांबा द्या
यासाठी परिवहन मंडळाच्या बेळगाव विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मार्गावर जलद बसेसची संख्या वाढवावी तसेच जांबोटी-कुसमळी-बेळगाव अशी स्थानिक बससेवा सुरू करावी, तसेच सर्व जलद बसगाड्याना कुसमळी व किणये येथे बसथांबा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जांबोटी भागातील प्रवासी व विद्यार्थी वर्गातून होत आहे.









