वार्ताहर /नंदगड
हलशी बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे बसच्या प्रतीक्षेत प्रवासी वर्गांना गैरसायींचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी त्वरित बस स्थानकाची दुरूस्ती करावी अशी मागणी म. ए. युवा समिती व या भागातील जनतेच्यावतीने करण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत हलशी बसस्थानक आहे. हलशी हे खानापूर तालुक्यातील मुख्य पर्यटन स्थळ आहे. नरसिंह मंदिर हलशी येथे असून दररोज शेकडो पर्यटक नरसिंह मंदिराला भेट देत असतात. आजूबाजूच्या वीस-पंचवीस गावचा संपर्क हलशी गावाशी येतो. प्रायमरी व माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी तसेच नंदगड, खानापूर व बेळगावला जाण्यासाठी येथील बस स्थानकाचा वापर शेकडो नागरिक व विद्यार्थी करत असतात.
बस स्थानकाची इमारत धोकादायक
बस स्थानकाची इमारत धोकादायक अवस्थेत असून प्रवाशांसाठी उभारलेल्या बस स्थानकात सध्या भटकी कुत्री व जनावरे आढळून येतात. तीस वर्षांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचे तत्कालीन आमदार व्ही. वाय. चव्हाण व त्यावेळच्या मंत्र्यांकडून या बस स्थानकाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर बस स्थानकाच्या विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष के आहे. बऱ्याचदा या बस स्थानकाचा प्रश्न सरकारी दरबारी मांडण्याचा प्रयत्न येथील कार्यकर्त्यांनी केला आहे. गुरूवारी खानापूर तालुका म. ए. युवा समितीच्यावतीने पाहणी करून तेथील आजी-माजी लोकप्रतिनिधींची मते जाणून घेऊन या बस स्थानकाचा प्रश्न सोडवण्यासाठी इमारतीला मोठा निधी द्यावा व प्रवाशांसाठी बाकीच्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात असे मत मांडून सरकार दरबारी या बसस्थानकाचा आवाज उठविला जाणार आहे, असे खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी सांगितले. यावेळी युवा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









