हुतात्मा स्मारक परिसरात आंदोलन : केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन दडपशाहीला आळा घालण्याची मागणी
बेळगाव : सीमावासियांचा विसर पडलेल्या महाराष्ट्र सरकारला हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मुंबई येथील हुतात्मा स्मारक परिसरात आंदोलन करण्यात आले. सीमाप्रश्नासाठी रक्त सांडलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून त्यानंतर आंदोलनाद्वारे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना 17 जानेवारी व 1 जून रोजी अभिवादन केले जाते. मागील दोन वषर्पांसून मराठी भाषिकांवरील दडपशाहीत वाढ झाली आहे. सीमाप्रश्न न्यायालयात असल्याने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावून परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते. याला कर्नाटक सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावत कन्नडसक्ती अधिक तीव्र केली आहे.
दडपशाहीला पायबंद घाला
महाराष्ट्र सरकारने तात्काळ केंद्र सरकारची भेट घेऊन दडपशाहीला पायबंद घालावा, तसेच कन्नडसक्ती विरोधात महाराष्ट्र सरकारने ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी म. ए. समितीचे युवानेते शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सूरज कणबरकर, विजय जाधव, मनोहर हुंदरे, विनायक हुलजी, सचिन दळवी, प्रवीण रेडेकर यांसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









