सावंतवाडी : प्रतिनिधी
शाळा बंद करण्याच्या शासनाच्या धोरणाविरोधात आजरा शाळा बचाव आंदोलनाच्यावतीने लॉंगमार्च सुरू करण्यात आलाय. सोमवारी हा लॉंगमार्च शालेय शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचणार. 20 पटसंख्येपेक्षा कमी संख्या असल्याचे कारण पुढे करीत राज्यातील पंधरा हजाराहून अधिक शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या घरावर आजरा ते सावंतवाडी असा लॉंग मार्च शनिवारी आजरा येथून सुरू झाला आहे .आजरा शाळा बचाव आंदोलनाच्या वतीने हा लॉंग मार्च काढण्यात येत आहे . हा लॉंगमार्च कॉम्रेड संपत देसाई, कॉम्रेड संजय तरडेकर, प्रकाश पाटील, शिवाजी गुरव ,संजय घाटगे गोविंद नारळकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत आहे. रविवारी 29 नोव्हेंबरला संध्याकाळी आंबोली येथे लॉंगमार्चचे संध्याकाळी आगमन होणार आहे. तर 30 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता हा लॉंगमार्च शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी पोहचणार आहे. शासन जोपर्यंत निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचे संपत देसाई यांनी स्पष्ट केले आहे. या शिक्षण हक्क यात्रेत शेकडो लोक सहभागी झाले आहेत.
राज्य सरकारच्या या धोरणामुळे वाडी वस्तीवरील हजारो शाळा बंद होणार आहेत. याचा पहिला फटका मुलींना बसणार आहे. समूह शाळेच्या नावाखाली खाजगीकरणाच्या दिशेने सरकार वाटचाल करीत आहे. शिक्षण हक्क कायदा झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण सर्वांना मोफत उपलब्ध होईलअसे वाटतं होते. पण त्याच कायद्याचा गैरवापर करीत राज्य सरकार बहुजन समाजातील, कष्टकरी जात वर्गातील मुलांच्या शिक्षणाचा गळा घोटू पाहतंय. मुळातच इथे शिकण्याला बंदी होती. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेल्या संघर्षातून आता कुठे पहिली पिढी शिकत आहे. त्यांच्या शिक्षणाची वाट कायमची बंद करणारे हे धोरण आहे. याविरोधात हे आंदोलन आहे.
जोपर्यंत २० पटाखालील शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेत नाही. तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुजाण नागरिक, पालक शिक्षक यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शाळा बचाव आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे.









