कोल्हापूर प्रतिनिधी
अश्रूंच्या नकळत जखमांशी सलगी करण्याचा अघोरी प्रकार म्हणजे गझल. असं सांगत गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी कोल्हापूरचा रसिकांना केला मंत्रमुग्ध केले. गझलच्या सादरीकरणाला रसिकांनी टाळयांच्या गजरात दाद दिली.
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे? पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे? या ओळी अशा गझल रसिकांच्या ओठावर असतातच. पण या ओळींना जेव्हा गजलनवाज भीमराव पांचाळे स्वरसाज चढवतात तेव्हा स्वरांचा स्वर्ग उभा राहतो. कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहात गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गझल मैफलीचा अनुभव सोहळा पार पडला. डॉ. प्रवीण कोडोलीकर आणि योगिता कोडोलीकर यांच्या प्रयोदी फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित गझल कार्यक्रमाचे उद्घाटन भगीरथी महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागीय सहसंचालक अशोक उबाळे, रिपाइं जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, विजय महाडिक, वृषाली पाटील, डॉ. सरोज बिडकर, डॉ. सत्यजित कोसंबी, किशोर घाटगे, अशोक पाटील, रणजीत झपाटे, अजिंक्य शिंदे, महेश राठोड, समाधान बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांचे स्वागत डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी केले.प्रयोदी फाउंडेशनच्या अध्यक्षा योगिता कोडोलीकर यांच्या हस्ते केके कापूण वर्धापण साजरा केला.
गझल नवाज भीमराव पांचाळे यांची कन्या भाग्यश्री पांचाळे प्रथमच कोल्हापूरमध्ये आपले गायकीचे भाग्य आजमावत होती. ‘आयुष्य तेच आहे अन हाच पेच आहे, तू भेटशी नव्याने बाकी जुनेच आहे’. या गजलेला अक्षरश: रसिक प्रेक्षकांनी टाळयांचा गजर केला. ‘हे का कुणी फुलांना सांगायला हवे ऋतूशी त्यांनी कसे वागायला हवे’ या गजलेतून निसर्गाचा गजलेशी असणारा ऋणानुबंध उलगडला. कवी किशोर बळी यांनी निवेदन केले.









