आंतरराज्य मार्गांवर धावणार बसेस : शहर-ग्रामीण भागात बसेसची कमतरता : शक्ती योजना अंमलबजावणीपासून बससेवेवर प्रवाशांचा ताण
बेळगाव : परिवहनच्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन चार बसेसना सोमवारी चालना देण्यात आली. विभागीय नियंत्रक गणेश राठोड, डीटीओ के. के. लमाणी, डेपो मॅनेजर ए. वाय. शिरगुप्पीकर आदींच्या हस्ते या नवीन बसेसचा शुभारंभ करण्यात आला. परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता असल्याने सार्वजनिक बस वाहतुकीवर परिणाम होऊ लागला आहे. दरम्यान, परिवहनला नवीन बस खरेदी करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या बसेसवरच डोलारा सुरू आहे. कोरोनामुळे परिवहनला मोठा फटका बसला. त्यामुळे तिजोरीत ठणठणाट निर्माण झाला आहे. दरम्यान, बीएमटीसीकडून गतवर्षी 25 जुन्या बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रवासी वाहतुकीदरम्यान या बसच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. परिणामी सार्वजनिक बस वाहतूक विस्कळीत होऊ लागली आहे.
तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार
परिवहनने राज्य सरकारकडे बसेसची मागणी केली होती. 150 हून अधिक बसेसची कमतरता असताना केवळ चार बसेस देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार करण्यात आला आहे. शक्ती योजनेच्या अंमलबजावणीपासून बससेवेवर प्रवाशांचा ताण वाढला आहे. त्या तुलनेत बसेसची संख्या कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. मात्र, केवळ बेळगाव विभागाला नवीन चार बसेस देण्यात आल्या आहेत. या बसेस आंतरराज्य प्रवासासाठी धावणार आहेत. त्यामुळे शहरांतर्गत आणि ग्रामीण बससेवेची गैरसोय कायम राहणार आहे.
नवीन 150 हून अधिक बसेसची गरज
बेळगाव विभागात दाखल झालेल्या नवीन चार बसेस बेंगळूर, मुंबई आणि हुबळी मार्गांवर धावणार आहेत. त्यामुळे या आंतरराज्य मार्गांवरील बसेसचा ताण काहीसा कमी होणार आहे. सद्यस्थितीत मध्यवर्ती बस स्थानकातून दैनंदिन 650 हून अधिक बसेस विविध मार्गांवर धावत आहेत. काही आंतरराज्य तर काही शहरी आणि ग्रामीण भागात धावतात. मात्र, प्रवाशांच्या तुलनेत बसेसची संख्या कमी असल्याने खासगी वाहनांबरोबरच प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे परिवहनच्या ताफ्यात नवीन 150 हून अधिक बसेस गरजेच्या असल्याचेही सांगण्यात येत आहे.









