बेळगाव ; वडगाव-यरमाळ रस्त्यावर रात्रीच्यावेळी वर्दळ कमी असल्याचा फायदा तळीरामांना होत आहे. रस्त्याच्या शेजारीच घोळके करून दारू ढोसत बसल्याचे चित्र वरचेवर दिसत आहे. यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणारे शेतकरी तसेच महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने हे प्रकार वाढले आहेत. वडगाव परिसरातील अनेकांची शेती यरमाळ रस्त्याला लागून आहे. काही शेतकऱ्यांनी भाजी तसेच उसाची लागवड केल्याने रात्री उशिरापर्यंत शेतकरी शेतामध्ये असतात. या रस्त्याला वर्दळ काही प्रमाणात कमी असल्याने मद्यपींचा उन्माद वाढला आहे. दारू ढोसून बाटल्या फोडणे, शेताची नासधूस करणे असे प्रकार घडत आहेत. यापूर्वी पोलिसांकडून रात्रीच्यावेळी गस्त घालण्यात येत होती. परंतु सध्या पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने मद्यपींचे फावले आहे. या रस्त्यावरून शहापूर शिवारात शेती असणाऱ्या नागरिकांसोबतच अवचारहट्टी यरमाळ, देवगनहट्टी, के. के. कोप येथील वाहनचालकांची ये-जा असते. रात्रीच्यावेळी रस्त्यामध्येच मद्यपींचा हैदोस सुरू असतो. याचा नाहक मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. रात्रीच्यावेळी रस्त्याने ये-जा करणे, महिलांसाठी तापदायक ठरत आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी केली जात आहे.
Previous Articleवैविध्यपूर्ण सजावटीच्या साहित्याचे आकर्षण
Next Article गणेशोत्सवासाठी विशेष बससेवा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









