बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाबाबत खासदारांची नैत्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे मागणी
बेळगाव ; बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गाला मंजुरी देऊन चार वर्षे उलटली तरी अद्याप भू-संपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यामुळे बेळगाव-धारवाड प्रवासाचा वेळ वाढत असून, रेल्वेचे इंधनही वाया जात आहे. त्यामुळे रेल्वेमार्गासाठी लवकरात लवकर सर्वेक्षण करून भू-संपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी खासदार मंगला अंगडी यांनी नैत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव किशोर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. खासदार मंगला अंगडी यांनी सोमवारी हुबळी येथील नैत्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयात महाव्यवस्थापकांची भेट घेऊन बेळगाव परिसरात सुरू असलेल्या रेल्वेच्या कामकाजांचा अहवाल जाणून घेतला. बेळगाव-धारवाड हा रेल्वेमार्ग 73 किलोमीटर आहे.
सर्वेक्षण पूर्ण झाल्यास भू-संपादन करणे सोयीचे
सप्टेंबर 2019 मध्ये या रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आली. तसेच 924 कोटी रुपये अनुदानही देण्यात आले. मंजुरी मिळून चार वर्षे उलटली तरी अद्याप या रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळालेली नाही. रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण वेळेत पूर्ण झाल्यास भू-संपादन करणे सोयीचे होणार असल्याची मागणी खासदारांनी केली.
मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद
टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट येथे ओव्हरब्रिजचे काम अद्याप अर्धवट आहे. ओव्हरब्रिजसाठी लागणारे साहित्य त्याच परिसरात पडून आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सदर काम वेळेत पूर्ण करावे. तसेच बेळगाव-पंढरपूर, बेळगाव-पुणे व बेळगाव-चेन्नई या मार्गावर रेल्वे सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. रेल्वे महाव्यवस्थापकांनी मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी नैत्य रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.









