पुणे / प्रतिनिधी :
जालना येथे मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. दोन दिवसात सरकाने निर्णय घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात बेमुदत बंद पुकारण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिला.
या पत्रकार परिषदेला महासंघाचे उपाध्यक्ष संतोष नानवटे, राज्य संपर्क प्रमुख अनिल ताडगे, शहर सरचिटणीस मयूर गुजर आणि राजेंद्र पासलकर उपस्थित होते. यावेळी बोलताना जगताप म्हणाले, सरकारच्या वतीने संकट मोचक म्हणून गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन गोड गोड बोलले. पण सरकार काही करत नाही. काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते वडेवट्टीवार यांनी देखील 50 टक्क्यातून मराठय़ांना आरक्षण द्या असे वक्तव्य केले आहे. महासंघाकडून त्यांचे अभिनंदन करतो. भाजप विरोधाची लाट संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. जर आरक्षण देणार असेल तर ते केवळ ओबीसीमधूनच दिले जाऊ शकते. त्यामुळे सरकारने येत्या दोन दिवसात यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा. तसेच गृहमंत्री यांनी केवळ माफी न मागता तातडीने राजीनामा द्यावा. अन्यथा संपूर्ण बेमुदत महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येईल, असा इशाराही जगताप यांनी यावेळी दिला.








