ऑनलाईन टीम / तरुण भारत :
वैफल्यग्रस्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरील खालच्या पातळीवर टीका करणे थांबवले नाही तर आम्ही कृतीतून उत्तर देऊ, असा इशारा भाजप आ. प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरेकर म्हणाले, हिंगोली येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी अत्यंत असभ्य भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी जपान दौऱ्यावर गेले होते. तुम्ही आरामासाठी परदेशात गेला होता. कोविड काळात भ्रष्टाचाराने कलंकित झालेल्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांवर टीका करण्याचा हक्क नाही. सत्ता हातून गेल्याच्या वैफल्यातून भ्रमिष्ट झालेले उद्धव ठाकरे बाष्कळ आरोप करत आहेत.
उद्धव ठाकरेंना राज्य आणि देशाच्या विकासाशी काही देणेघेणे नाही. मुख्यमंत्री असताना ते केवळ घरच्यांच्या विकासात रममाण होते. केंद्राच्या लोकहितार्थ योजना कुठल्या हे देखील माहिती नसणारे उद्धव ठाकरे, उचलली जीभ लावली टाळ्याला या उक्तीप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करतात. शिवसेनेसाठी आपल्या घराची राखरांगोळी करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण काय दिले हे उद्धव ठाकरेंनी स्वतःला विचारावे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यातून अनेक प्रकल्प बाहेर गेले. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या काळात राज्यात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक आल्याने महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये पुन्हा अव्वल स्थानावर गेला आहे.








