Ratnagiri News : पालकमंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी चांदेराई येथे भेट देत पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. 77 दुकानदारांना प्रत्येकी 50 हजार तर, टपरीधारकांना प्रत्येकी 10 हजाराची मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह,जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार प्रांताधिकारी जीवन देसाई,तहसीलदार राजाराम म्हेत्रे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी ते म्हणाले की , सुमारे 77 दुकानांमध्ये पाणी शिरले होते. 2 दिवस दुकानात पाणी होते. त्यामुळे प्रत्येक दुकानदाराला प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत तसेच टपरीधारकांना दहा हजार देण्याचा निर्णय घेतलेला आहे.ज्या ठिकाणी जमीन खचण्याच्या घटना घडल्या आहेत,त्याची देखील पाहणी करण्याच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांना दिल्या आहेत. चांदेराई नदीमधील गाळ काढावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करून हा सगळा गाळ काढण्यात येईल.पाणी शिरुन नुकसान झालेल्या घरांच्या बाबतीतही पंचनामे करुन मदत देण्याबाबत अहवाल तयार करण्याचे निर्देशही दिल्याचे पालकमंत्री म्हणाले.









