वारणातून जतला दोन टी.एम.सी. पाणी; जत टंचाई आढावा बैठक; हयगय केल्यास गय नाही : खा. संजयकाका पाटील
जत, प्रतिनिधी
जत तालुक्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली असताना तहसील कार्यालयाकडून उपाय योजना करण्यात दिरंगाई होत असल्याचा संताप व्यक्त करून खासदार संजयकाका पाटील यांनी तहसीलदार जिवन बनसोडे यांची चांगलीच कानउघडणी केली. टंचाईकाळात लोकांच्या भावनांचा खेळ केलात तर गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा खासदार पाटील यांनी दिला. पंचायत समितीच्या सभागृहात खासदार पाटील यांनी शनिवारी टंचाई आढावा बैठक घेतली. तालुक्यातील टंचाईची व त्यावर प्रशासनाकडून होणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
प्रारंभी प्रशासनाने तयार केलेल्या टंचाई आराखड्याची माहिती घेण्यात आली. तालुक्यातील ऐकुंडी गावचा टँकरचा प्रस्ताव २३ जूनला तर बसरगीचा २६ जूनला प्रस्ताव आलेला आहे. मात्र टँकर सुरू करण्यास विलंब होत असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी लक्ष वेधल्यानंतर खासदार संजयकाका पाटील संतापले. त्यांनी तहसीलदार जिवन बनसोडे यांची कानउघाडणी केली. टंचाईच्या काळात होणारी हयगय खपवून घेतली जाणार नाही असे सांगून तहसील कार्यालयाचा कारभार सुधारा अन्यथा याची दखल घ्यावी लागेल. लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच सर्व विभागाचा आढावाही त्यांनी घेतला.
बुधवारपर्यंत जतला म्हैसाळचे पाणी
सद्याच्या टंचाई परिस्थिती बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शुक्रवारी रात्री फोनवरून चर्चा झाली आहे. सद्या कोयना धरणात उपलब्ध पाणी साठा कमी असल्याने पर्याय म्हणून चांदोली धरणातून ५ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणीस यांनी दिले आहेत. त्याचे नियोजन रविवारपासून होणार असून बुधवारपर्यंत पाणी जतला पोहचेल. त्यामुळे तालुक्याला दिलासा मिळेल असा विश्वास खासदारांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार विक्रम सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, केंद्रीय सिमेंट बोर्डाचे संचालक डॉ. रवींद्र आरळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सरदार पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य दिग्विजय चव्हाण, युवा नेते मंगेश सावंत, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, माजी सभापती बाबासाहेब कोडग आदी उपस्थित होते.








