पुणे / प्रतिनिधी :
मागील साडेतीन वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटीहून अधिक नागरिकांना रेशन दुकानावर मोफत अन्नधान्य देण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांना केंद्राकडून 6 हजार आणि राज्य सरकार 6 हजार अशी एकूण 12 हजारांची मदत दिली जात आहे. या मदतीमधून शेतकरी कसा उभा राहील. यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला देशात निश्चित महागाई वाढली असून ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयत्न करीत आहेत, अशी भूमिका उत्तर प्रदेशचे भाजपचे ज्येष्ठ नेते केशवप्रसाद मौर्य यांनी मांडली.
वाढत्या पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे नागरिकांचे जगणे मुश्किल झाले असून महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार कोणती पावलं उचलत आहे. त्या प्रश्नावर केशवप्रसाद मौर्य यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तर प्रदेशचे केशवप्रसाद मौर्य हे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी पुणे शहर भाजप कार्यालयास केशवप्रसाद मौर्य यांनी भेट दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कारभाराबाबत माहिती पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक धीरज घाटे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
मौर्य म्हणाले, मागील नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती पथावर आहे. त्यामुळे अनेक उद्योग व्यवसाय देशातील अनेक ठिकाणी उभारले जात आहे. प्रत्येक देशात नरेंद्र मोदी यांचं तेथील राष्ट्राध्यक्ष उत्साहात स्वागत करीत आहेत.अमेरिका सारख्या देशाने नरेंद्र मोदी यांना एकेकाळी व्हिसा नाकारला होता. आता त्याच देशाचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे त्यांचं स्वागत करीत असतात. हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नितीमुळे शक्य झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा जगभरासह आपल्या देशातील प्रत्येक नागरिकामध्ये वेगळी निर्माण झाली आहे. पण, विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. विरोधकांनी किती ही ताकद लावली तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशात 350 हून अधिक, तर उत्तर प्रदेश मध्ये 75 जागा येतील आणि महाराष्ट्रामध्ये 45 जागा भाजपच्या निवडून येतील असा विश्वासही मौर्य यांनी यावेळी व्यक्त केला.
जगभरातील राष्ट्रध्यक्षांच्यासोबत पंतप्रधानांची मैत्री
जगभरातील राष्ट्राध्यक्ष सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच मैत्रीचे नाते निर्माण झाले असून युक्रेन आणि रशिया युद्धाच्या वेळी सर्वांनी पाहिले आहे. आपल्या येथील सर्व तरुणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.








