पुणे / प्रतिनिधी :
शिक्षणसेवकांच्या वेतनाबरोबरच शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ तसेच शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश करण्यासारखे विविध धोरणात्मक निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात येत असून, त्याची क्षेत्रीय स्तरावरून अंमलबजावणी करावी. नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शैक्षणिक क्षेत्रात उपयोग करावा आणि मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात यावा, अशी सूचना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.
लोणावळा येथील ‘दि ऍम्बी व्हॅली सिटी’ येथे समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी, योजना संचालनालयाचे संचालक महेश पालकर आदी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, देशाची पुढची पिढी घडविण्याचे पवित्र काम शिक्षण विभागाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्यादृष्टीने या कार्यशाळेत एकत्र विचारमंथन करावे. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण, अंगणवाडी सेविकांना नर्सरीबाबत शिक्षण, शारीरिक शिक्षण, चित्रकला, गायन, नाटय़ आदी कलाविषयक शिक्षण, विद्यार्थ्यांचा मानसिक अभ्यास, नाविन्यपूर्ण उपक्रम, भारतीय संस्कृतीचा अभ्यास, शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने, उपाययोजना, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यासारख्या विविध बाबींवर वैचारिक देवाण घेवाणही या कार्यशाळेत करावी. आपल्या सूचनांचा शासनस्तरावर विचार करून शिक्षण विभागाची पुढची दिशा ठरवली जाईल.
विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती असून त्यांना समृद्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे. मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात यावा. शिक्षकाने बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञान अवगत करावे. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देवून रोजगारक्षम पिढी निर्माण करावी. प्राथमिक शिक्षण आयुष्याचा पाया असून त्यादृष्टीने पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. प्रत्येक शाळेत ग्रंथालय, क्रीडांगण असावे. शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडवावी. सर्वांनी एकत्रित प्रयत्न करुन शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राला अग्रस्थानी ठेवावे, असे आवाहनही केसरकर यांनी केले.
शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत मंथन : देओल
देओल म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची क्षेत्रीय स्तरावर अमंलबजावणी करणे, क्षेत्रीय स्तरावर होणाऱया कामाबद्दल या कार्यशाळेत चर्चा करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभाग गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर देत असून त्याअनुषंगाने मोठय़ा प्रमाणावर निधी सर्व जिह्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभागात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी योजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी करावी.
गुणवत्तापूर्ण शिक्षणास प्राधान्य : मांढरे
मांढरे म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गुणवत्तापूर्ण, सर्वंकष शिक्षणाला विभागाने प्राधान्य दिलेले आहे. शिक्षणातील बदलते स्वरुप पाहता आगामी काळात आपल्याला मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. शैक्षणिक विकासासाठी दिलेल्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी सर्वांनी एकत्र येवून काम करणे, शैक्षणिक उपक्रम राबवितांना येणाऱया उणिवा दूर करणे हे या कार्यशाळेच्या आयोजना मागचा हेतू आहे.








