पणजी : जी-20 आरोग्यविषयक कृतीगटाची दुसरी बैठकीच्या समारोप सत्रास उपस्थित राहण्यासाठी आलेले केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी विविध देशांच्या प्रतिनिधींसह पणजीतील एका जनऔषधी केंद्राला भेट दिली. यावेळी ओमान, जपान, रशिया, नायजेरिया, सिंगापूर, मलेशिया आदी जी-20 देशांचे प्रतिनिधी तसेच युनिसेफ आणि बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या भेटीदरम्यान सर्व उपस्थितांनी जनऔषधी केंद्राच्या मालक प्रभा मेनन यांच्याशी संवाद साधला. यावेळी मंत्र्यांनी जनऔषधीसंबंधी केंद्र सरकारच्या कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच योजनेच्या कामकाजाबाबत प्रतिनिधींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी अनेक प्रतिनिधींनी असा कार्यक्रम आपापल्या देशांमध्येही लागू करण्याबद्दल स्वारस्य व्यक्त केले. त्यानुसार आता अशा देशांना मदत करण्यासाठी ‘मॉडेल’ तयार करण्याच्या दिशेने सरकार काम करत आहे, असे मांडवीय यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी जनऔषधी या लोककल्याणकारी योजनेबद्दल माहिती दिली. त्यामुळे सामान्य लोकांना ब्रँडेड औषधांपेक्षा 50-90 टक्के कमी दरामध्ये ही औषधे उपलब्ध करून दिली जातात. त्याचा लोकांच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडला असल्याचे त्यांनी सांगितले. वर्ष 2014 मध्ये देशात केवळ 80 जनौषधी केंद्रे होती. गेल्या 9 वर्षात त्यात शंभरपट वाढ झाली आहे. उत्पादनाची व्याप्ती 1,800 औषधे आणि 285 शस्त्रक्रिया उपकरणांपर्यंत विस्तारली आहे. त्यामुळे 9 वर्षांमध्ये नागरिकांची अंदाजे 20 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त बचत झाली आहे, असे मांडवीय म्हणाले. यावेळी मेनन यांनी केंद्र चालवण्याचा आपला अनुभव सांगितला.
Previous Articleअजित पवार, संजय राऊत मतभेद वाढले
Next Article विद्याभारती गोवा राज्य, जिल्हा कार्यकारिणी जाहीर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









