अनेक आंदोलनानंतर राजाराम कारखाना सहकारी झाला. पण 28 वर्षात हा कारखाना सहकारी राहिला काय़ ? हा प्रश्न उपस्थित होतो. हा कारखाना खासगी झाला तर त्याचे पाप माझ्यावर नको म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात आहे. कारखाना आणि महाडिक यांचा काही संबंध नसून ते आयते आले आणि मालक झाल्याचा घणाघाती आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. ते आज वडणगे येथे शाहू परिवर्तन पॅनेलच्या प्रचार सभेत बोलत होते.
राजाराम कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये आपल्या शाहू परिवर्तन पॅनेलचा प्रचारात बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टिका केली. महाडिक गटाला लक्ष करताना त्यांनी राजाराम कारखाना आणि महाडीक गटाचा काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, “राजाराम कारखाना उभारताना शेअर्स गोळा करणारा हे कोणीही नव्हते. करार राजाराम कारखान्याचा…वाहनं राजारामची आणि ऊस बेडकिहाळ कारखान्याला नेला जातोय.”
पुढे बोलताना त्यांनी , “काल आंबेडकर जयंती होती. माझ्यावर जबाबदारी होती. तिथं काही घडलं असतं तर मला माझ्या जबाबदारीची जाणीव आहे, कारण मी या मातीतला आहे. महाडिक हे येल्लूरचं पार्सल आहे. डी. वाय. पाटील कारखान्याची निवडणूक लागल्यावर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बंटी पाटील समर्थ आहे. मला आमदार केलं म्हणता, त्यावेळी मला फक्त एकच मत पडलं होतं का ?”
“2005 साली मी आणि पी. एन. पाटील नसतो तर काय झालं असतं हे महाडिक यांनी सांगावं. गेले महिनाभर संसदरत्न खासदार मंत्रिपदासाठी दिल्लीत ठाण मांडून आहेत. तुमच्या कालच्या भाषणावर सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आहेत ते तुम्हीच बघा मला बोलायची गरज नाही. एफआरपी दिली नाही म्हणून भीमा कारखान्यावर कारवाई सूरु असताना त्यांनी सहकारावर बोलायचं हे दुर्दैव आहे.” असा आरोप त्यांनी केला.
शेवटी बोलताना त्यांनी “बेफाम, खोटं आणि रेटून बोलायचं ही महाडिकांची प्रवृत्ती आहे. एका गावातील तीन उमेदवार म्हणता मग एका घरातील दोन उमेदवार कसे काय दिले? पावणे दोन लाखांनी कोल्हापूरच्या जनतेने तुमचा पराभव केलाय, तुमच्या टीकेला उत्तर देण्याची गरज वाटत नाही. 28 वर्षे त्यांच्याकडे कारखाना दिला आता 5 वर्षे हा कारखाना आमच्याकडे देऊन बघा. मी किती मोठा आहे, माझी ताकद काय आहे याची उत्तर 23 तारखेनंतर देईन आज ती वेळ नाही.” असे आव्हान त्यांनी महाडीक गटाला दिले.









