म्हैसूर येथे आयकॉन भारत संवर्धन परिषद देशात वाघांची संख्या 3,500 हून अधिक
वाळपई / प्रतिनिधी
देशातील 53 व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या 3,500 च्या पुढे गेली आहे. देशात वाघांच्या संवर्धनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच वाघांची संख्या 3,500 च्या पुढे गेली आहे. दरम्यान, अधिकृत वाघांची संख्या ही 9 एप्रिल रोजी होणाऱ्या म्हैसूर येथील आयकॉन भारत संवर्धन परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. भारतातील वाघांसाठी प्रतिष्ठित संवर्धन योजना असलेल्या प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. ‘प्रोजेक्ट टायगर’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, देशात प्रथमच 9 ते 11 एप्रिलदरम्यान कर्नाटकातील म्हैसूर येथे आयकॉन भारत संवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रोजेक्ट टायगरचा पाया 1 एप्रिल 1973 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट प्रकल्पात रचला होता.
29 जुलै 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाघांची एकूण संख्या 2,967 असल्याचे सांगितले होते. दरवर्षी केंद्रीय वन, पर्यावरण, हवामान बदल मंत्रालय 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिनी वाघांची संख्या जाहीर करते. केंद्रीय वन, पर्यावरण, हवामान बदल मंत्रालय, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण, भारतीय वन्यजीव संस्था आणि कर्नाटक वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील वन व्यवस्थापक, संरक्षक आणि वन संवर्धन क्षेत्र आदी विषय एकाच छताखाली आणणे हा परिषदेचा उद्देश आहे.
बैठकीत वाघांच्या ज्वलंत समस्या तथा वन्यजीव संरक्षणासाठी उपाय शोधले जातील. तसेच वन संरक्षण क्षेत्रातील धोरण तयार करणे आणि इतर चर्चा होईल. देशात दर चार वर्षांनी वाघांची गणना केली जाते. दरम्यान, कोरोनामुळे 29 जुलै 2022 रोजी वाघांच्या संख्येची आकडेवारी जाहीर होऊ शकली नव्हती, असे संशोधकांनी सांगितले.
वाघांच्या संख्येतील वाढ…
2006 मध्ये वाघांची संख्या 1,411 होती. 2010 मध्ये 1,706 व 2014 मध्ये 2,226, तर 2018 मध्ये 2,967 वाघांची संख्या आहे. अशा प्रकारे देशातील वाघांची संख्या वाढली आहे. या परिषदेत वाघाच्या संख्येचा लेखाजोखा पंतप्रधान जाहीर करतील. वार्षिक गणनेत वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचा अंदाज आहे.









