मृतांमध्ये पाच भारतीयांचा समावेश ः यती एअरलाईन्सचे विमान कोसळल्यानंतर आगीच्या भक्ष्यस्थानी
काठमांडू / वृत्तसंस्था
नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक 72 जणांना घेऊन जाणारे विमान रविवारी अपघातग्रस्त झाले. या विमानातून प्रवास करणाऱया सर्वांचा मृत्यू झाला आहे. त्यात पाच भारतीयांचाही समावेश आहे. अपघातावेळी विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू सदस्य होते. दुपारर्पंत एकूण 67 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. पोखरा विमानतळावर लँडिंग करण्याच्या दहा सेकंद आधी हे विमान अपघातग्रस्त झाले आहे. या विमानातील सर्वजण मृत पावल्याचा दावा केला जात आहे. या भीषण विमान अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी 5 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

यती एअरलाईन्सचे एटीआर-72 हे प्रवासी विमान 72 जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा या मार्गावर होते. या विमानाने रविवारी सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. हे विमान पोखरा रविवारी सकाळी 11 वाजता आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही अंतरावर असणाऱया सेती गंडकी नदीच्या काठावरील जंगलात कोसळले. अपघातग्रस्त विमानाच्या अवशेषाला आग लागली असून बचाव कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुख्य जिल्हाधिकारी टेक बहादूर केसी यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले. तसेच दुर्घटनाग्रस्त विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते, असे यती एअरलाईन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. अपघातग्रस्त विमानातील 68 प्रवाशांपैकी 10 प्रवासी परदेशी नागरिक होते. यामध्ये 5 भारतीयही होते. विमानात 53 नेपाळी, 5 भारतीय, 4 रशियन, एक आयरिश, 2 कोरियन, 1 अर्जेंटिनी आणि एक प्रेंच नागरिक असल्याचेही बर्तौला यांनी स्पष्ट केले.
अपघातानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या छायाचित्रे आणि व्हिडिओंमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. अपघातस्थळी हेलिकॉप्टरसह बचाव पथक तैनात करण्यात आले आहे. नेपाळमधील पोखरा येथे यती एअरलाईन्सचे विमान कोसळल्यानंतर काठमांडू येथील भारतीय दुतावासाने विमानातील लोकांची माहिती किंवा कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. भारतीय दुतावास या घटनेबाबत स्थानिक अधिकाऱयांच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
नेपाळमध्ये एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा
पोखरा विमानतळावर यती एअरलाईन्सच्या विमान अपघातानंतर नेपाळ सरकारने सोमवारी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. विमान अपघातानंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड हे गृहमंत्री रबी लामिछाने यांच्यासह पोखरा येथे पोहोचले होते. अपघाताबद्दल शोक व्यक्त करत प्रचंड यांनी गृह मंत्रालय, सुरक्षा कर्मचारी, नेपाळ सरकारच्या सर्व यंत्रणांना प्रभावी बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
भारताकडून शोक व्यक्त
नेपाळच्या भारतातील राजदुतांनी पोखरा येथे 5 भारतीयांसह 72 प्रवासी आणि चालक दलातील सदस्य असलेल्या विमानाच्या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो, असे त्यांनी स्पष्ट पेले. भारताचे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नेपाळमधील दुःखद विमान अपघातातील लोकांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
तांत्रिक बिघाडामुळे अपघात?
यती एअरलाईन्सचे विमान हवामानामुळे नव्हे तर तांत्रिक बिघाडामुळे कोसळल्याचा दावा नेपाळच्या विमानतळ प्राधिकरणाने केला आहे. पायलटने एटीसीकडून लँडिंगची परवानगी घेतल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच खराब हवामानामुळे हा अपघात झाला असे म्हणता येणार नाही, अशी चर्चा आहे. याप्रकरणी ब्लॅकबॉक्सच्या तपासाअंतीच निश्चित कारण पुढे येणार आहे.
पोखरा विमानतळावरून सर्व उड्डाणे रद्द
पोखरा येथे रविवारी यती एअरलाईन्सचे विमान कोसळल्यानंतर पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते टेकनाथ सितौला यांनी सांगितले.









