झारखंडमधील एक युवक 2017 पासून आजपर्यंत आपले घर सोडून देशभ्रमण करीत आहे. आतापर्यंत 21 राज्यांचे भ्रमण करून हा युवक रांची येथे आला आहे. त्याचे नाव एल. पुलापोचम असे आहे. त्याच्या देशभ्रमणामागे कोणताही राजकीय अथवा आर्थिक हेतू नाही, असे त्याचे म्हणणे आहे. तसेच कशाचा तरी प्रचार करण्यासाठी किंवा एक अभियान म्हणूनही तो हे देशभ्रमण करत नाही. मग तो एवढे परिश्रम कशासाठी करतो? हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. या युवकाचे यावर उत्तर असे की तो केवळ भारताच्या संस्कृतीची वैविध्ये पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी हे देशभ्रमण स्वखर्चाने करीत आहे. आपण हे देशभ्रमण कोणत्याही संस्थेला मदत व्हावी म्हणून किंवा कोणत्याही विचारसरणीचा प्रचार किंवा प्रसार करण्यासाठी करत नसून केवळ देश समजून घेण्याचे आत्मसमाधान हाच उद्देश आहे, असे त्याचे म्हणणे आहे. देशभ्रमणासाठी त्याने कुठलाही प्रायोजक शोधलेला नाही. मात्र, लोक स्वतःहून साहाय्यासाठी पुढे येतात, असा त्याचा देशभरातील अनुभव आहे. त्यामुळे देशामध्ये अजूनही माणुसकी मोठय़ा प्रमाणावर टिकून आहे. हा अनुभव मला अतीव सुख देणारा ठरला, असे तो सांगतो. हा युवक चित्रकार असून आपली पेंटींगची सामग्री घेऊनच तो हे भ्रमण करीत आहे. विविध स्थानांची छायाचित्रे घेण्यापेक्षा चित्रे काढण्यावर त्याचा भर आहे. त्याच्या पेंटींग्जना मागणीही भरपूर आहे. केवळ आत्मसमाधानासाठी अशाप्रकारचे देशभ्रमण ही पहिलीच घटना असावी, असे त्याच्याबद्दल अनेक तज्ञांचे मत आहे.
Previous Articleविद्युतभारीत तारेच्या स्पर्शाने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू
Next Article केनियामध्ये बेपत्ता भारतीयांची हत्या
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









