पुणे / प्रतिनिधी :
सुशिक्षित आणि गुणवंत तरुणांसाठी राजकारण हाही एक चांगला पर्याय आहे. सुशिक्षित तरुण राजकारणात येत नाहीत, तोपर्यंत राजकारणात परिवर्तन होणार नाही, अशी भूमिका केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल (piyush goyal) यांनी येथे मांडली.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या 23 व्या पदवी प्रदान समारंभ दीक्षान्त भाषणावेळी गोयल बोलत होते. नॅकच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, प्र-कुलगुरू आणि कृषी-सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. अँथनी रोज, कुलसचिव जी. जयकुमार आदी या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात 8 हजार 184 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. तर 70 विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि 46 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात आले.
गोयल म्हणाले, केंद्र सरकारने तरुणांतील क्षमतांचा अभ्यास करूनच स्टार्ट अप इंडियासारख्या योजना आणल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणात लवचिकता येत आहे. तरुणांनी त्याचा लाभ घेत संकल्पनांना उद्योगाचे रूप द्यायला हवे. कोरोना हे एक संकट म्हणून आले असले, तरी त्यातून अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. आताच्या काळात जागतिक पटलावर सर्वच क्षेत्रांत अनेक संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे तरुणांनी पारंपरिक वाटा चोखाळण्याऐवजी नवकल्पनांच्या माध्यमातून आव्हानांना भिडायला हवे.








