पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा : उद्योजकांशी साधला संवाद
नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
आता दरवषी 16 जानेवारी हा दिवस देशात ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ म्हणून साजरा केला जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. शनिवारी स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली. जे स्टार्ट-अपच्या जगात भारताचा स्टार्टअप, त्या सर्व स्टार्ट-अप उद्योजकांचे, तसेच कल्पक तरुणांचे पंतप्रधानांनी यावेळी अभिनंदन केले. स्टार्टअपची ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचण्यासाठी दरवषी 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच सरकारने स्टार्टअप उद्योगांच्या वाढीला आणि विकासाला चालना देण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने काम केले आहे. याचा देशातील स्टार्टअप इको-सिस्टीमवर मोठा प्रभाव पडल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील 150 स्टार्ट-अप्स उद्योजकांसोबत संवाद साधला. यामध्ये कृषी, आरोग्य, उद्योजक, अवकाश, उद्योग 4.0, सुरक्षा, तंत्रज्ञान आधारित आर्थिक सेवा, पर्यावरण इत्यादींसह विविध क्षेत्रातील स्टार्टअप्स या संवादात सहभागी झाले होते. 150 हून अधिक स्टार्टअप्सची सहा कार्यकारी गटांमध्ये विभागणी केली गेली होती. स्टार्टअप्स देशात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राष्ट्रीय गरजांमध्ये कसे योगदान देऊ शकतात यासंबंधी या संवादामध्ये विचारमंथन करण्यात आले.
देशात नाविन्यपूर्णतेचे आकर्षण लहानपणापासूनच निर्माण करणे आणि देशातील नव्या उपक्रमांना संस्थात्मक रूप देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 9,000 हून अधिक अटल टिंकरिंग लॅब सध्या मुलांना नवनवीन शोध आणि नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नवतरुणांमध्ये नाविन्याचे आकर्षण निर्माण करणे हे देशाचे ध्येय असल्याचे पंतप्रधान म्हणाले. इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत सध्या 46 व्या क्रमांकावर आहे. 2015 मध्ये भारत या क्रमवारीत 81 व्या क्रमांकावर होता. या क्रमवारीत आणखी सुधारणा करण्याचा सरकारचा मानस आहे. सरकारचे वेगवेगळे विभाग, मंत्रालये ही तरुण आणि स्टार्टअप्सच्या संपर्कात राहतात. त्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन देण्याचे काम करतात. तसेच अधिकाधिक तरुणांना नवनिर्मितीची संधी देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.









