प्रतिनिधी /काणकोण
आम आदमी पक्षाच्या रोजगार यात्रेला ने काणकोण येथे गर्दी खेचली. राज्यभरातील युवकांचे आकर्षण ठरू लागलेली रोजगार यात्रा बुधवारी काणकोण येथे दाखल झाली. त्यावेळी शेकडो स्वयंसेवकांनी हजेरी लावली. त्यानंतर बूथस्तरीय बैठका झाल्या. या यात्रे दरम्यान रोजगार हमीसाठी नागरिकांनी आपली नावनोदणी केली.
हल्लीच्या काळात काणकोणमधील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. सामान्य गोमंतकीयांना रोजगार मिळत नाही. विद्यमान आमदार विकासाचे आश्वासन देऊन काँग्रेसमधून भाजपात गेले. तरीही त्यांनी केवळ आपल्या खिशाचा विकास केला. काणकोण पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असल्याने महामारी आणि लॉकडाऊनमुळे उद्योगावर अवलंबून असलेली कुटुंबे मोठय़ा संकटाला सामोरी जात आहेत. अशा कठीण प्रसंगी भाजप सरकार आणि आमदार गायब झाले होते. लोकांना मदत करणे सोडून दिले होते. खाणी बंद केल्याने बेरोजगारीचे संकट आणखी वाढले आहे, कारण बरेच स्थानिक लोह-धातूची वाहतूक करणाऱया बार्ज अथवा ट्रकवर काम करत होते. स्थानिक आमदाराने स्वतःच्या पुत्राला बनावट प्रमाणपत्र देऊन सरकारी नोकरी मिळवून दिली. हा प्रकारही जनता विसरलेली नाही, असे मत व्यक्त करण्यात आले.
केजरीवाल यांनी केलेली 80टक्के आरक्षणाची घोषणा किंवा खाजगी नोकऱयांमध्ये गोव्याच्या आश्वासनाबद्दल रहिवासी उत्साहित आहेत. युवकही अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या वचनानुसार कौशल्य विद्यापीठाची वाट पाहत आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.
केपेतही रोजगार यात्रेला पाठिंबा
दरम्यान, आम आदमी पक्षाच्या‘रोजगार यात्रे’ला केपे येथे उत्स्फूर्त पाठिंबा लाभला. केपे विधानसभा प्रभारी राऊल परेरा आणि आप महिला शाखा अध्यक्ष पेट्रिसिया फर्नांडिस यांनी त्याचे नेतृत्व केले. शेकडो स्वयंसेवकांनी या यात्रेत सहभाग घेतला. त्यानंतर बूथस्तरीय बैठका झाल्या. विद्यमान सरकारवर नाराज असलेल्या रहिवाशांची लक्षणीय हजेरी या बैठकांना होती.
केपेममध्ये बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. तरुणांना नोकऱया मिळत नाहीत. अशावेळी केजरीवाल यांनी दिलेल्या खाजगी उद्योगात 80 टक्के आरक्षणाच्या आश्वासनाबद्दल तरुणाई उत्साहित आहेत. त्याचबरोबर युवकही कौशल्य विद्यापीठाची वाट पाहत आहेत.
या प्रसंगी विचार व्यक्त करताना परेरा यांनी, केजरीवाल यांनी गोव्याला दिलेले वचन प्रत्यक्षात येऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळेच तरुण आणि केपेचे रहिवासी मोठय़ा संख्येने आमच्याकडे येत आहेत, असे ते म्हणाले. पेट्रिसिया फर्नांडिस यांनीही आपले विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘बेरोजगारीच्या सध्याच्या परिस्थितीशी लढण्यासाठी केजरीवाल यांनी दिल्लीच्या डीएसईयूच्या धर्तीवर कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याची योजना आखली आहे. यामुळे तरुणांना नोकऱया मिळण्यास मोठी मदत होईल. तरुणांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.









