बेळगाव :
एखाद्या विषयाची अभ्यासू पद्धतीने मुद्देसुद मांडणी कशी करावी आणि विषयाचे सखोल ज्ञान जर असेल तर ती मांडणी कशी छान होते, याचे सुंदर उदाहरण म्हणजे प्रा. द. तु. पाटील यांनी सादर केलेला ‘80 नंतरची मराठी ग्रामीण कादंबरी’ हा मोठा व महत्त्वपूर्ण विषय होय. बुलकच्या पंचसंवत्सरपूर्ती ई-कार्यक्रमांतर्गत शुक्रवार दि. 14 रोजी त्यांनी हा विषय सविस्तरपणे मांडला.
कोरोनाच्या संकटात नव्या साधनाद्वारे ही संधी दिल्याबद्दल बुलकचे आभार मानत 80 पूर्वीचे व नंतरचे साहित्य आणि 90 पर्यंतचे व नंतरचे साहित्य असा अनेक लेखकांचा, कादंबऱयांचा उल्लेख करीत खेडय़ात शिरलेला शहरी चंगळवाद, भ्रष्टाचार, मटक्मयाचं व्यसन, आधी दूध पिणारा पण आता दारू पिणारा शेतकरी, शहरीकरणाचा प्रभाव, साखरकारखाने, सावकारी, गाव पंचायत, जिल्हा परिषद, राजकारण, कागदावरच राहणाऱया सरकारी योजना, दुष्काळ, कर्ज, शेतकऱयांच्या आत्महत्या, शिकलेल्या तरुणाची घराला वाचविण्यासाठीची धडपड, जागतिकीकरण, अशा अनेकविध विषयांना स्पर्श त्यांनी केला.
निशाणी डावा अंगठा, बनगरवाडी, मेड ईन इंडिया, हल्या हल्या दूध दे, फकिरा, रथचक्र, पाचोळा अशा व इतर कादंबऱया तर व्यंकटेश माडगुळकर, महेंद्र कदम, रफिक, ना. घो. महानोर, रणजित देसाई, भालचंद्र नेमाडे, आनंद दिवाकर, राजन गवस, प्रतिमा इंगोले, सदानंद देशमुख अशा अनेक नव्या-जुन्या लेखकांचा उल्लेख करत त्यात दलित व दलितेर साहित्य व ग्रामीण महिलांविषयीही त्यांनी उल्लेख केला. विषयाची व्याप्ती मोठी पण वेळ थोडा असूनही प्रा. पाटील यांनी विषयाला न्याय दिला. त्यांच्या मांडणीतून विषयावरील त्यांची पकड आणि आवड दिसून आली. व्याख्यान निश्चितच माहितीपूर्ण झाले.
आज साहित्यिक किरण येले बोलणार
शनिवार दि. 15 रोजी सायंकाळी साहित्यिक किरण येले हे ‘कोरोनाचा साहित्य विश्वावरील परिणाम’ या आजच्या ज्वलंत विषयावर बोलतील. हर्षदा सुंठणकर सादरकर्त्या असतील.









