रत्नागिरी :
इंद्रायणी नदीवरील साकव दुर्घटनेनंतर साकवांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आलेला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील सर्व साकवांचे पुनर्सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत.
पुण्यातील साकव दुर्घटनेनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागातील सर्व साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून तातडीने साकवांच्या दुरुस्तीसाठी सर्वेक्षणाची धावपळ सुरू झालेली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये यावर्षी जिह्यातील 608 साकव दुरुस्तीच्या पटलावर आले आहेत. लवकरच साकव दुरुस्तीचा नवा आकडा प्रशासनस्तरावरून लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अनेक दुर्गम वाडीवस्त्यांना जोडण्यासाठी साकव बांधण्यात आले आहेत. मोठे वहाळ, नदीनाले, पऱ्यांवर साकव आहेत. अनेक ठिकाणी मुलांना शाळा, महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी तसेच दळणवळणासाठी साकवांचा वापर होतो.








