40 to 50 acres of cashew and mango orchards at Aros were burnt
आंबा व काजू बागायतीमध्ये आगीचे सत्र सुरू असून आरोस कळंगुटकरवाडी येथे सुमारे 40 ते 50 एकरवरील काजू व आंबा बागायती जळून खाक झाल्या. जवळपास 2920 काजू कलमे व 15 आंबा कलमे जळाल्याने सुमारे चार ते पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
आरोस कळंगुटकरवाडी येथील शेतकऱ्यांनी कर्ज काढून आंबा काजू बागायती तयार केल्या. चार-पाच वर्षे वावरल्याने उत्पन्न देणारी काजू कलमे आशादायी ठरली होती. परंतु अचानक लागलेल्या आगीत सर्व कलमे जळून खाक झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत व कष्ट वाया गेले. आग लागल्याचे लक्षात येताच सर्व ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. परंतु दुपारची वेळ असल्याने आग नियंत्रणाच्या बाहेर गेली. तरीसुद्धा शर्तीचे प्रयत्न सुरूच ठेवल्याने ग्रामस्थांना यश आले व आग आटोक्यात आली. 40 ते 50 एकरवरील काजू बागायती व आंबा बागायती जळाल्याने आमचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतकरी उदय कुबल, झिलू कुबल, कृष्णा कुबल, सखाराम सावंत, दत्तगुरु दळवी, रामचंद्र कासले, राजाराम दळवी, गुंडू कळंगुटकर, दत्तगुरु कुबल, बाबुराव कळंगुटकर, विलास कळंगुटकर, रमाकांत कळंगुटकर, भिवनेश कळंगुटकर, नर्मदा कोरगावकर, भरत कळंगुटकर, सावित्री कळंगुटकर, सिताराम कळंगुटकर, पांडुरंग कळंगुटकर, सुभाष कळंगुटकर, नामदेव कळंगुटकर, मोहन कळंगुटकर, अनिल कळंगुटकर, गजानन नाईक, शांताराम कुबल आदी शेतकऱ्यांच्या बागा जळाल्या.दरम्यान, आरोस सरपंच शंकर नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी जात पाहणी केली असता सुमारे पन्नास एकरवर लागलेल्या आगीत आपल्या गावातील अनेक शेतकऱ्यांचे अंदाजे चार ते पाच कोटी रुपयांच्यावर नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने तात्काळ दखल घेत पंचनामा करावा अशा सूचनाही त्यांनी केल्या. दरम्यान, बुधवारी लागलेल्या या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही .
न्हावेली / वार्ताहर









