मुंबईतील महिलेसह चौघांची आंतरराज्य टोळी जेरबंद : टोळीत सांगली, खानापूर येथील आरोपींचा समावेश
मडगाव : कोकण रेल्वे मार्गावरील धावत्या रेल्वेतून प्रवाशांचे किंमती सामान चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला पोलिसांनी जेरबंद करुन 4 कोटी दागिन्यांच्या चोरी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांना या टोळीकडून 1 कोटीचे सोने (25 टक्के)s आणि रोख 50 हजार रुपये जप्त करण्यात यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या या टोळीत मुंबईतील एका महिलेचा समावेश असून तीच या प्रकरणाची सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘मधु ऑर्नामेंट्स’ या ज्वेलर्सकडून सोन्याचे तयार दागिने मुंबईहून दक्षिण भारतात पाठविले जाणार होते. या आस्थापनात 55 वर्षीय अशोक पाटील नावाचा कर्मचारी ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. तो सुमारे 4 कोटी किंमतीचे हे दागिने देण्यासाठी एका दिवशी एका रेल्वेने दक्षिण भारतात जाणार होता.
अर्चना मोरेला मिळाली सोन्याची माहिती
ही माहिती तळोजा-नवी मुंबई येथील अर्चना उर्फ आर्ची मोरे (42 वर्षे) या महिलेला समजली. या टोळीमध्ये या महिलेसह सांगली परिसरातील संदीप भोसले (40 वर्षे), खानापूर-बेळगाव येथील अक्षय चिनवाल आणि परळ-मुंबई यथील धनपत हंसराज बैड (44 वर्षे) यांचा समावेश होता. अर्चना मोरे हिने 4 कोटीच्या दागिन्यांच्या प्रवासाची तारीख व इतर सविस्तर माहिती आपल्या वरील सहकाऱ्यांना पुरविली होती.
अशोक पाटीलचा केला पाठलाग
जी व्यक्ती 4 कोटीचे दागिने घेऊन प्रवास करणार होती, त्या व्यक्तीचे सविस्तर वर्णन आरोपी अर्चना हिने आपल्या सहकाऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे ऑफिस बॉय अशोक पाटील यांचा पाठलाग करणे किंवा त्याच्यावर पाळत ठेवणे या टोळीला सोपे झाले. गांधीधाम-तिरुनेलवेली हमसफर सुपरफास्ट एक्सप्रेस या रेल्वेतून ऑफिस बॉय अशोक पाटील 4 कोटी रुपये किंमतीचा सोन्याचा माल घेऊन 1 मे 2023 रोजी प्रवास करीत होता.
झोपेत असताना बॅग उचलून पसार
क्रॉसिंग करण्यासाठी रेल्वे काणकोण रेल्वे स्थानकावर थांबली होती. तेव्हा अशोक पाटील याच्याकडून तो झोपेत असताना 4 कोटी किंमतीचे सोन्याचे दागिने असलेली बॅग काढून घेऊन दोन आरोपी खाली उतरले आणि त्यानंतर मिळेल त्या वाहनाने ते काणकोण येथून अन्यत्र गेले.
अर्चना मोरे पोलिसांच्या ताब्यात
या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली, तेव्हा पोलिसांनी या प्रकरणातील बारकाव्यांकडे लक्ष दिले आणि सर्वप्रथम संशयाची सुई अर्चना मोरे हिच्याकडे वळू लागली. पोलिसांनी मुंबईतील स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने आरोपी अर्चना मोरे हिला सर्वप्रथम ताब्यात घेतले.
अजून तीन कोटींचे सोने बाकी
अर्चनाकडून पोलिसांना या प्रकरणातील इतर आरोपीची नावे कळाली. त्या त्या जागी जाऊन पोलिसानी या टोळीतील इतर चोरट्यांना अटक केली. आतापर्यंत या टोळीकडून 4 कोटीपैकी सुमारे 1 कोटी रुपयांचे सोने अर्थात चोरीचा 25 टक्के माल हस्तगत करण्यात यश आले आहे. उर्वरित 3 कोटी रुपये किंमतीचे सोने अजून हस्तगत करायचे आहे. चारजणांच्या या टोळीला मडगावच्या न्यायालयापुढे उभे करण्यात आले तेव्हा न्यायालयाने या टोळीला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. कोकण रेल्वे पोलीस अधीक्षक गुरुदास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम, पोलीस निरीक्षक सुनिल गुडलर, हवालदार सत्यवान नाईक गावकर, श्रीनिवास रेड्डी, अमरदीप चौधरी, समीर शेख, सत्यवान गावकर, गौरेश नाईक व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.









