रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शासनाकडे प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी निधीची मागणी करण्यात आली आहे. या बाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घालून जिल्हा नियोजनमधून सन २०२४-२५ या – वर्षात शाळा दुरुस्तीसाठी ३ कोटी ६३ लाख रुपये मंजूर केले आहेत.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील २०६ प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. शाळा दुरुस्तीसाठी प्रस्ताव २६७ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी शाळा दुरुस्तीचे २०६ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. तर ६१ शाळांच्या नादुरुस्त इमारतींसाठीही निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
या धोकादायक इमारतींमध्ये बसून मुले शिक्षण घेत आहेत तर काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी शाळा भरत आहेत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी धोकादायक ठरणाऱ्या शाळांच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून हा निधी मंजूर करण्यात आला असून या शाळा लवकरच दुरुस्त करण्यात येणार आहेत.
- अपेक्षित निधीची प्रतीक्षा
आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत काही शाळा डिजिटल झाल्या असल्या तरी काही धोकादायक शाळांमध्ये जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. नादुरुस्ती शाळा दुरुस्तीसंदर्भात शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत तसेच पालकांकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येतो. शाळा दुरुस्तीसाठी शासनाकडून अपेक्षित प्रमाणात निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे.








