प्रतिनिधी / अ. लाट
येथे 2019 मध्ये आलेल्या प्रलयकारी महापुरात शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी नुकसानग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना शासनाने पंचनामे करून कोट्यवधीचा निधी पाठवला होता, परंतु तळागाळातल्या शेवटच्या नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना हा निधी न पोहचवता नुकसान न झालेल्या आणि लागेबांधे सांभाळण्याच्या नादात वेगळ्याच लोकांच्या घरात हा निधी खिरापत समजून वाटल्याची अनेक प्रकरणे बाहेर पडू लागल्याने संपूर्ण चौकशी लावून हा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रा,संजय परीट यांनी एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.
संपूर्ण घर पडलेल्या नागरिकांना प्रत्येकी 95,000 चा निधी तर अंशतः पडझड झालेल्याना 6000 रु. तर ज्यांच्या घरात महापुराचे पाणी आले होते. अशा कुटुंबाना रोख 5000 तर खात्यावर 5000 अशी मदत तर पूर्ण घर पडलेल्या नागरिकांना दरमहा 4000 प्रमाणे 6 महिन्याचे 24000 रु. घरभाडे अशी मदत तर शेतीचे पंचनामे करून त्यांनाही नुकसान भरपाई शासनाने देऊ केली होती.
मात्र या वाटपात मोठा घोळ झाल्याचे आता उघड होत आहे. वारंवार मागणी करूनही लाभार्थ्यांची यादी तलाठी आणि ग्रामसेवक जाहीर करत न्हवते परंतु राज्यमंत्री नामदार यड्रावकर यांनी आढावा बैठकीमध्ये नागरिकांच्या मागणीवरून यादी जाहीर करण्याचा आदेश दिला आणि केवळ अस्पष्ट आणि वाचता न येणाऱ्या पुसट याद्यांचे झेरॉक्स एका टॅग मध्ये लावून जनतेची चेष्टा केली आहे.
प्रत्यक्षात पंचनामे केल्याचा फार्स करून ज्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. अशा अनेक बड्या आणि जवळच्या लोकांची नांवे यादीत घुसडून त्यांना 95000 चा लाभ दिला आहे. यामध्ये अनेकांनी या कामी प्रशासनातल्या लोकांचे हात ओले केल्याची चर्चा आहे. एकाच कुटुंबात राहणाऱ्या लोकांची कुटुंबे विभक्त दाखवून जास्त लोकांना लाभ देणे, भाडेकरूंच्या खोट्या याद्या तयार करून 24000 प्रमाणे भाडे वाटप,मूळ नुकसानग्रस्त लोकांचे नावावरचे अनुदान दुसऱ्याच जवळच्या लोकांच्या बँक खात्यावर जमा करणे,घरात पाणी न येताच त्यांना 10000 रु. चा लाभ देने,शेतीचे पंचनामे बोगस करून बगलबच्छांना मदत तर खरे नुकसान झालेले अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. अशा अनेक तक्रारी आता पुढे येत आहेत.
या प्रकरणात शासनाच्या निधीचा गैरवापर करून गरीब लोकांच्या तोंडचा घास पळवण्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. या संपुर्ण प्रकरणाची माहिती घेऊन अन्यायग्रस्त नागरिकांना तक्रारी देण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण माहिती मिळताच शेवटच्या माणसापर्यंत ही मदत मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असून यातील दोषी आणि जबाबदार घटकांवर कारवाईची मागणी आपण तहसीलदार,जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयात करणार असून फुकटचे लाटलेले अनुदान वसूल करण्यासाठी ही प्रसंगी जनआंदोलन उभे करणार असल्याची माहितीही या निवेदनाद्वारे प्रा.संजय परीट यांनी केली असून अन्यायग्रस्त नागरिकांनी तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयात आपल्या लेखी तक्रारी द्याव्यात असे आवाहन ही त्यांनी केले आहे.








