ऑनलाईन टीम / पुणे :
शासनाने कृषीपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी आणलेल्या ‘कृषीपंप धोरण-2020’ अंतर्गत कृषी योजनेची अंमलबजावणी राज्यात सर्वत्र सुरु आहे. कडेगाव विभागातील 193 शेतकऱ्यांनी एकाच दिवशी तब्बल 82 लाख 22 हजार रुपये एकरकमी भरुन वीजबिल कोरे करण्याची संधी पटकावली आहे. परिणामी कृषी वसुलीत राज्यात अग्रेसर असलेल्या बारामती परिमंडलाने 50 कोट्टींचा टप्पा गाठला आहे.
मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अधिकारी-कर्मचारी वसुलीसाठी गावोगावी शेतकरी मेळावे आयोजित करत आहेत. शेतकऱ्यांना कृषी योजनेचे फायदे समजावून सांगत आहेत. परिणामी थकबाकी भरण्यासाठी शेतकरी पुढाकार घेत आहेत. बारामती परिमंडलात पुणे जिल्ह्यातील 6 तालुके तर सोलापूर व सातारा हे दोन जिल्हे येतात. शेतीपंपाचे एकूण 7 लाख 36 हजार ग्राहक असून, त्यांच्याकडे सप्टेंबर 2020 अखेर तब्बल 8 हजार 144 कोटी थकबाकी आहे. कृषी धोरणांतर्गत थकबाकीचे पुनर्रगठण करुन ही थकबाकी 5 हजार 925 कोटी इतकी झाली आहे. त्याच्या केवळ 50 टक्के व चालू देयक असे मिळून 3 हजार 225 कोटी इतकी रक्कम भरावयाची असल्याने शेतकरी एकरकमी थकबाकी भरत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी भरलेल्या रकमेतील 33 टक्के रक्कम गावपातळीवर व 33 टक्के जिल्हापातळीवर वीज यंत्रणेच्या बळकटीसाठीच वापरली जाणार आहे. परिमंडलात आतापर्यंत 50 कोटींचा भरणा झाला असून, बारामती परिमंडल राज्यात अग्रेसर ठरले आहे.
तर केडगाव विभागांतर्गत मांडवगण फराटा व पारगाव येथे झालेल्या मेळाव्यात 193 शेतकऱ्यांनी अनुक्रमे 55 लाख 60 हजार व 25 लाख 60 हजार इतकी रक्कम भरल्यामुळे 82 लाखांची विक्रमी वसुली झाली असून, केडगाव विभागाने वसुलीत 2 कोटीची मजल मारली आहे. या सर्व शेतकऱ्यांचा कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी सत्कार करत इतर शेतकऱ्यांनाही थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे. यावेळी उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने, संजय मालपे यांचेसह शाखा अभियंते पप्पू पिसाळ, मतिन मुलाणी व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.








