चारमिनारजवळील इमारतीला आग, 15 जणांना वाचवले, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय
वृत्तसंस्था/ हैदराबाद
हैदराबादमधील चारमिनारजवळील गुलजार हाऊसमधील एका इमारतीला रविवारी सकाळी आग लागली. या अग्नितांडवात आठ मुलांसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेच्या वेळी इमारतीत 30 हून अधिक लोक उपस्थित होते. यापैकी 15 जणांना वाचवण्यात यश आले. बचावकार्यासाठी अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना दोन तास कठोर परिश्रम करावे लागले. आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात आहे, परंतु अद्याप अधिकृतपणे याची पुष्टी झालेली नाही.
रविवारी सकाळी 6:16 वाजता अग्निशमन विभागाला आगीची माहिती मिळाली. त्यानंतर पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. यादरम्यान अनेक लोक बेशुद्ध अवस्थेत आढळले. वाचविलेल्यांपैकी 10 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग विझविण्यासाठी आधुनिक अग्निशमन रोबोट आणि ब्रोंटो स्कायलिफ्ट हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला. ब्रोंटो स्कायलिफ्ट हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म एका मोठ्या अग्निशमन दलावर बसवलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या तळमजल्यावर दागिन्यांची दुकाने होती आणि वरच्या मजल्यावर लोक राहत होते. दुकानांमध्ये आग लागली आणि वरच्या मजल्यावर पसरली. इमारतीत फक्त एकच अरुंद जिना असल्यामुळे लोक बाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळे इमारतीतील रहिवाशांचा गुदमरून मृत्यू झाला.
तेलंगणाच्या मंत्री पन्नम प्रभाकर यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली. आग सकाळी 6 वाजता लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवाना काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचले. टीमने सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आग खूप वेगाने पसरली होती. इमारतीत राहणारे 17 लोक मरण पावले, असे त्यांनी सांगितले. या दुर्घटनेदरम्यान वाचविण्यात आलेल्यांवर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
अपघाताबद्दल पंतप्रधान मोदींना दु:ख
पंतप्रधान मोदींनी या घटनेबद्दल तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. हैदराबादमधील आगीच्या घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे खूप दु:ख झाले. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल संवेदना. जखमींना लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील, अशी घोषणाही पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली.









