कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेला शुक्रवार (दि. 21) पासून प्रारंभ होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 54 हजार 810 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. कोल्हापूर विभागीय मंडळाने परीक्षेचे सर्व साहित्य परीक्षा केंद्रांवर पोहचवले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मुल्यमापन परीक्षा संपल्या असून, लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. विद्यार्थी संख्येनुसार परीक्षा केंद्र निश्चिती केली आहेत. उत्तरपत्रिका, पुरवणी, आलेख व इतर साहित्य परीक्षा केंद्रावर पाठवण्यात आले आहेत. जिल्हानिहाय पर्यरक्षक व केंद्र संचालकांच्या नियुक्ती केली आहे. परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी भरारी पथकांसह बैठ्या पथकांची नियुक्ती केली आहे. सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. तसेच कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
- परीक्षा केंद्र व विद्यार्थी
परीक्षार्थी-54,810
परिरक्षण केंद्रे-17
परीक्षा केंद्रे-138
कर्मचारी वर्ग बदललेली परीक्षा केंद्र संख्या-34
परीक्षार्थी प्रविष्ट करण्राया शाळांची संख्या-977
- हॉल तिकिट विसरल्यास हे करा
एखाद्या पेपरला हॉल तिकिट विसरल्यास घाबरून न जाता पर्यवेक्षक किंवा केंद्रसंचालक यांच्या ही बाब निदर्शनास आणावी. केंद्रावर दुबार प्रवेशपत्र असल्याने पडताळणी करता येऊ शकते. पण जाणीवपूर्वक विसरु नये. केंद्र संचालकांकडे हमीपत्र लिहून द्यावे, दुसऱ्या दिवशीच्या पेपरवेळी प्रवेशपत्र न चुकता आणावे, ते केंद्रसंचालकांना दाखवावे.
- परीक्षेला जाताना याची घ्या काळजी
प्रवेशपत्र, परीक्षेसाठी निळी किंवा काळी शाईचा पेन, पारदर्शक परीक्षा पॅड, ज्यावर काही लिहिलेले नसावे, पाणी बॉटल, शुगरचा विद्यार्थी असल्यास आवश्यक औषधे, गणित विषयासाठी आवश्यक असणारी विहित सामग्री,
घेवून यायचे आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅलक्युलेटर किंवा इतर तत्सम इलेट्रॉनिक साहित्य परीक्षा दालनात घेवून जाता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत अनावधानाने अगर जाणिवपूर्वक कोणताही कागद खिशामध्ये, कंपास बॉक्समध्ये राहणार नाही याची खात्री विद्यार्थ्यांनी करावयाची आहे.
- शाळांनी घ्यावयाची काळजी
सर्व विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटवरील विषय, माध्यम दुरुस्ती मंडळाकडून समक्ष पत्र देऊन करावी. तोंडी किंवा प्रात्यक्षिकांचे गुण ऑनलाइन मुदतीत भरावे. परीक्षा केंद्र असलेल्या शाळांमध्ये आवश्यक वर्गखोल्या, बेंचेस, पंखे, वीजदिवे, स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही कॅमेरे, पिण्याच्या पाण्याची सुविधा असावी. गैरमार्ग यादीतील परीक्षा केंद्र असलेल्या शाळा प्रमुखांनी भौतिक सुविधा सुसज्ज करूनच बदललेल्या केंद्र संचालकांच्या ताब्यात शाळा इमारत द्यावी. अखंड वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जनरेटरची व्यवस्था करावी.








