ऑनलाईन टीम / मुंबई :
संभाजी ब्रिगेड आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील अधिक चिघळताना दिसून येत आहे. संभाजी ब्रिगेडचे नेते ऍड. मनोज आखरे यांनी आज मुंबईत थेट राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे.
हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी आपल्याकडील इतिहास अभ्यासक, संशोधक आणावेत, आम्ही आमच्याकडील बहूजन समाजातील इतिहास अभ्यासक, संशोधक आणू आणि जाहीर चर्चा घडवून आणावी, असे मत मनोज आखरे यांनी व्यक्त केले आहे.
- महाराष्ट्राला वेठीस धरू नका…
मनोज आखरे म्हणाले, ‘राज ठाकरे यांनी हिंमत असेल तर आपल्याकडील इतिहास अभ्यासक, संशोधक आणि आमच्याकडील बहूजन समाजातील इतिहास अभ्यासक, संशोधक घेऊन जाहीर चर्चा करावी. सत्य इतिहासाचे दर्शन करावे. तिथे संदर्भ व पुराव्यासह मांडणी होईल. नाही तर उगाच मुक्ताफळे उधळून महाराष्ट्राला वेठीस धरू नये.
पुढे ते म्हणाले, सर्वांना माहिती आहे की तुमचा इतिहास हा दंगली घडविण्याचा आहे. आमचा इतिहास हा दंगली शमविण्याचा आहे. कारण तुम्ही आपण दंगलीचे स्त्राsत पसरविणारा इतिहास लेखन करणाऱया तोतया बाबासाहेब पुरंदरेंसारख्या शाहिरांच्या विचारांचे वारसदार आहात. आम्ही शिव-शाहु-फुले-आंबेडकर, अण्णाभाऊ, प्रबोधनकार ठाकरे आणि आता पुरुषोत्तम खेडेकर यांच्या विचारांचे वारसदार आहोत.
दरम्यान, राज ठाकरे यांनी राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या 20 वर्षापासून चित्रं बदलले आहे. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असे वक्तव्य केले होते. तेव्हापासून हा वाद सुरू झाला आहे.









