ऑनलाईन टीम / पुणे :
बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर हिंसाचार चालू केला आहे. भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरावर हल्ला करून मारहाण आणि जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना जीव देखील गमवावा लागला आहे. ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचा हा उन्मत्तपणा म्हणजे लोकशाहीचा खून असल्याची घणाघाती टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.
निवडणूक निकालानंतर बंगाल मधील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मुळीक बोलत होते.
मुळीक पुढे म्हणाले, ‘देशातील सर्व भाजपा कार्यकर्ते हे बंगाल मधील कार्यकर्त्यांच्या बरोबर आहेत. निवडणूक निकालानंतर अशा प्रकारचा हिंसाचार या देशात आजपर्यंत कधीही झाला नाही. परंतु बंगालमध्ये तो मोठ्या प्रमाणावर चालू आहे. ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेला हिंसाचार ताबडतोब थांबवावा अन्यथा या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी.’
यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, प्रभारी धीरज घाटे, सरचिटणीस राजेश पांडे,गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे, दत्ता खाडे, संदीप लोणकर, महिला अध्यक्षा अर्चना पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर, कार्यालय मंत्री संजय देशमुख, प्रमुख हेमंत लेले आदी उपस्थित होते.








