तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांची माहिती : महापालिका क्षेत्रातील ग्राहकांपर्यंत रत्नागिरीतून आंबा पोहोचवण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी / रत्नागिरी
‘हापूस ऍट युवर होम’ या योजनेअंतर्गत रत्नागिरीतून आंबा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघ प्रयत्नशील आहे. महापालिकांमध्ये राहणाऱया 3 कोटी ग्राहकांपर्यंत हापूस पोहोचला पाहिजे. याला आंबा बागायतदारांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष व माजी आमदार बाळ माने यांनी सांगितले.
रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाच्या दुसरी मासिक बैठकीत विविध विषयांवर निर्णय घेण्यात आले. त्यावेळी पॅनिंगसाठी आंबा विकताना तो 50 रुपये प्रति किलो या हमीभावाने विकावा. पॅनिंग पॅक्टरी प्रतिनिधींनी शेतकऱयांचे नुकसान न करता हा हमीभाव दिला पाहिजे. यासाठी तालुका खरेदी-विक्री संघ समन्वय साधणार असल्याचे माने यांनी स्पष्ट केले. थेट ग्राहकांपर्यंत आंबा विक्रासाठी शेतकऱयांना गतवर्षीप्रमाणे मदत करण्याचे धोरण तालुका खरेदी-विक्री संघाने आखले आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, पनवेल, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार, कल्याण डोंबिवली, भिवंडी आणि नाशिक या महापालिकांमध्ये सुमारे 3 कोटी जनता राहते. त्यांना थेट घरापर्यंत आंबा पोहोचला पाहिजे. गतवर्षी हा प्रयोग यशस्वी झाला होता व अनेक शेतकऱयांना फायदा मिळाला होता. यंदाही कोरोनाच्या संकट काळात हेच करावे लागणार आहे. केंद्र सरकार पुरस्कृत भात खरेदी योजनेनुसार शेतकऱयांपर्यंत माहिती पोचवण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. शेतकऱयांनी अधिकचे उत्पादन घेऊन ते हमी भावाने विक्री केल्यास हातभार लागेल. यासाठी जनजागृती करण्याचे काम तालुका खरेदी-विक्री संघ करत आहे. यासाठी तालुका दौरा सुरू आहे. सोमेश्वर, खेडशी, दांडेआडोम, चांदेराई, नाणीज, हातखंबा, करबुडे, शिरगाव येथे 15 मार्चपर्यंत बैठका घेण्यात येणार असल्याचे बाळ माने यांनी सांगितले.
पीक विमा लाभ देण्यासाठी तालुका खरेदी-विक्री संघ ठेवणार लक्ष
सध्या कोकणात बदलत्या हवामानामुळे शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून पीकविम्याचा लाभ झाला आहे का, या सर्व प्रक्रियेवर तालुका खरेदी-विक्री संघ लक्ष ठेवणार आहे. पीक विमा योजनेचे निकष, आंबा, काजू लागवड, भौगोलिक सलगता व हवामान बदल यानुसार विम्याचा लाभ शेतकऱयांना मिळाला पाहिजे. यासाठी तालुका खरेदी-विक्री संघ शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. शेतकऱयांवर अन्याय होत असेल तर त्यांनी खरेदी-विक्री संघाशी संपर्क साधावा, असे आवाहन बाळ माने यांनी केले.









