(अध्याय दुसरा)
भक्ती कशी करावी यावर भागवताच्या आधारे मार्गदर्शन करताना नाथ महाराज सांगतात, प्रथम काया, वाचा, मने प्रभूला सर्वस्व अर्पण करा. आपला सर्व भार त्याच्यावर टाका आणि निश्चिन्त मनाने गुरुसेवा करा, म्हणजे गुरुंवर आणि त्यांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवा आणि मनात येणारा प्रत्येक वाईट विचार देवाला अर्पण करा, म्हणजे पहा काय चमत्कार होतो! तुम्ही अंतर्बाह्य निर्भय व्हाल.
चित्तशुद्धीसाठी हरिचे अवतार, गुण व कर्मे मोठय़ा आवडीने, आदराने ऐकावीत. कारण हरि हा सगळय़ात श्रे÷ आहे. भगवंतानी केलेली परमार्थ युक्त कर्मे ऐकून त्यांचे मनन करावे. आपण जे ऐकतो ते मनन केल्याने परमपावन होतो. ज्या गोष्टीचे मनन करावयाचे आहे ती मन लावून ऐकली जाते. असे मन एकाग्र करून ऐकलेले हरिचे नाव कानात शिरताच अंतःकरणात स्थिर होते व त्याने सारे पाप धुतले जाऊन तो हरिचरणी तल्लीन होतो. हे सगळे हरिचरणी तुमची श्रद्धा असेल तरच शक्मय होते. कीर्तनाच्या गजराने हरि आनंदाने डोलू लागतो. हरिकीर्तन हा भक्तीचा राजमार्ग आहे आणि या मार्गात स्वतः चक्रपाणी रक्षण करत असतो. कसं? तर चक्राने अभिमानाचा चेंदामेंदा करतो, गदेने मोह ममतेला ठोकून काढतो, शंखाने आत्मबोध जागृत करतो आणि कमळाने सदैव आपल्या भक्ताची पूजा करतो. ज्यांना कथाकीर्तनाचा लाभ घेता येत नसेल त्यांनी नामस्मरण करावे.
हरिकीर्तीचे श्रवण व हरिनामाचे स्मरण केले असता अंतःकरणात सप्रेम भक्ती वाढत जाते. जागृतावस्थेत तर तो आवडीने गुण कीर्तन, स्मरण करत असतोच, पण हळूहळू ही स्थिती स्वप्नातसुद्धा राहते. असे झाले की हरिभक्ती उत्तम प्रकारे हृदयात ठसली असे समजावे. ही स्थिती प्राप्त झाली की चित्तात हरिनाम कीर्तनाविषयी अद्भुत प्रेम निर्माण होते. या प्रेमामुळे हरिची त्याच्यावर संपूर्ण कृपा होऊन त्याच्या आतबाहेर हरि प्रकट होत असतो.
भक्त आता भगवंत स्वरूप झालेला असतो, त्यामुळे भगवंताप्रमाणेच तोही सर्वत्र व्यापून राहिला आहे. इतर सर्वजण त्याचाच भाग आहेत किंवा त्याचीच रूपे आहेत असे त्याला वाटू लागते. मग कुणाचा राग, द्वेष, तिरस्कार अथवा निंदा तो कशाला करेल?
विधिपूर्वक पूजाविधान किंवा श्रवण, स्मरण, कीर्तन करत असताना ज्या भक्तांची सगळीकडे भगवंत भरून राहिला आहे अशी भावना होते त्यालाच पूर्वप्राप्ती साध्य होते. बाळ जसे आईजवळ धावत येते तसे जो खरा भक्त असतो त्याच्याजवळ विरक्ती धावत येते. जेव्हा भक्ती व विरक्ती एकाचवेळी भक्तामध्ये राहतात तेव्हा त्या सामर्थ्यावर भक्त मोठा बलवान होतो. जेथे भक्ती आणि विरक्ती एकत्र नांदू लागतात तेथे पूर्ण प्राप्ती ही सदासर्वकाळ दासीसारखी राबते. भक्ती आणि विरक्तीच्या एकोप्यामुळे भक्तांच्या घरी अनुभवप्राप्तीही नांदू लागते. यासाठी ज्याला स्वतःच्या हिताची लालसा असेल त्याने अतिशय आदराने हरिभक्ती करावी आणि श्रेष्ठ अशा परमपदाचा लाभ घ्यावा.
क्रमशः







