कित्तूर जेएमएफसी न्यायालयाचा निकाल
प्रतिनिधी/ बेळगाव
गोल्याळी वनविभागातील कित्तूर राखीव जंगलात हरणाची शिकार करण्यासाठी गेलेल्या दोघांना वनविभागाच्या अधिकाऱयांनी अटक केली होती. त्यांच्यावर वन्यजीवी कायदा 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्या दोघांनी कित्तूर येथील जेएमएफसी न्यायालयाकडे जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी होऊन या दोघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
उद्धव राजेंद्र नायक (रा. विनायकनगर), सागर यल्लोजी पिंगट (रा. काकती) अशी जामीन मिळलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही शिकारीसाठी जंगलात गेले होते. त्यावेळी या दोघांकडून डबल बॅरल बंदुक, 28 जिवंत काडतुसे, दोन हेडटॉर्च, एक चाकू, वॉकीटॉकी, चार बॉक्स एअरगनच्या गोळय़ा जप्त करण्यात आल्या होत्या. हे दोघेही स्वीफ्ट डिझायर कारमधून शिकारीसाठी गेले होते. त्यांच्या सोबत आणखी दोघे होते. मात्र ते फरारी झाले आहेत. विभागीय वनाधिकारी श्रीनाथ कडोलकर यांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर या दोघांनी जामीनसाठी अर्ज दाखल केला असता न्यायालयाने प्रत्येकी वैयक्तिक 1 लाखाचे हमीपत्र आणि जामीनदार या अटींवर त्यांना जामीन मंजूर केला आहे. साक्षीदारांना धमकावू नये, तपास अधिकाऱयांना सहकार्य करणे, अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, कित्तूर येथील डीआरएफओ कार्यालयाला प्रत्येक महिन्याच्या दुसऱया आणि चौथ्या शुक्रवारी हजर राहणे या अटीही घालण्यात आल्या आहेत. या दोघांच्यावतीने ऍड. सुधीर गावडे आणि ऍड. मल्लिकार्जुन बाळप्रवेश यांनी काम पाहिले.









