करमाळा शहरासह ग्रामीण भागातही थंडीची तीव्रता वाढली
प्रतिनिधी / करमाळा
गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढत असून, येत्या दोन दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर करमाळा शहरासह ग्रामीण भागातही थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे वापरण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात शेकोट्या पेटत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत असून, थंडीचा कडाका वाढू लागला आहे. तसेच किमान तापमानाचा पाराही खाली आला असून, हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी, तसेच सकाळी खेडोपाड्यात शेकोट्या पेटत असल्याचे चित्र दिसून येत आहे. उजनी व कोळगाव परिसरात येणारी पंचक्रोशीतील गावे, तसेच शहराच्या आसपासच्या बागायत भागातही थंडीची तीव्रता जास्त वाढली आहे.
दरम्यान, थंडी पाठोपाठ आता विविध संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढल्याचे चित्र दिसत आहे. सर्व ताप थंडीची साथ पसरली असून, या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. रस्त्यावरील धूळ, तसेच चिलटांमुळे नागरिकांच्या डोळ्यांना सुज येत असून, डोळ्याच्या साथीने अनेक रुग्ण बेजार झाले असल्याची चर्चा आहे. सध्या थंडीने आजारी पडलेले रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात न जाता खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
थंडी ही रब्बी पिकांना चांगली आहे तर द्राक्षबागांना धोकादायक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकीकडे खुशी तर दुसरीकडे दु:ख असा प्रकार पहावयास मिळत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, हरभरा, गहू या पिकांना वाढलेली थंडी पोषक ठरते , ऊसतोडणीसाठी आलेल्या मजुरांवर त्याचा विपरित परिणाम होऊ लागला आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान ऊसतोडणीचे काम करणारे ऊसतोड कामगार थंडीमुळे उशिरा कामावर जात आहेत.
मॉर्निंग वॉक वाढला
थंडीच्या दिवसात मोकळ्या हवेत फिरायला जाण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येने बाहेर पडत असून, मोकळा रस्ता, मंदिर परिसर व मोकळी मैदाने, बागा आता नागरिकांसाठी जॉगिंगची ठिकाणे झाली आहेत. थंडीमुळे त्वचा कोरडी पडत असल्यामुळे बॉडीलोशनला मागणी वाढली आहे. तर उबदारपणा ठेवण्यासाठी स्वेटर, कानटोपी, मफलर, हातमोज्यांना मागणी वाढली आहे.
शेकोटीभोवतीच्या गप्पा रंगल्या
नुकतीच करमाळा तालुक्यात ग्रामपंचायतीची निवडणुक लागली असून, या अनुषंगाने शेकोटीभोवती जमलेले लोकांत राजकीय गप्पा रंगत असल्याचेही चित्र दिसत आहेत. तशा अनेक विषयांवर चर्चेला ऊत येतो, मात्र सध्या कोरोना जवळपास संपुष्टात आला असून बिबट्यांची पण दहशत कमी झाली आहे, आता निवडणूक आणि राजकारण याचीच चर्चा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.









